Bomb Scare Near Mukesh Ambani's Home: आत्महत्येपूर्वी मनसुख हिरेन यांनी लिहिले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; मानसिक छळ होत असल्याचा केला होता आरोप
मुकेश अंबानींच्या धमकी प्रकरणाची चौकशी आता महाराष्ट्र अँटी टेरर स्क्वॉड (एटीएस) करणार आहे. यापूर्वी केवळ हिरेन यांच्या मृत्यूची चौकशी महाराष्ट्र एटीएसकडे देण्यात आली होती. आता राज्य एटीएस या दोन्ही प्रकरणांची चौकशी करेल.
काही दिवसांपूर्वी उद्योगपती नुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे व याबाबत रोज नवे नवे खुलासे समोर येत आहेत. काल माहिती मिळाली होती की या कारशी संबंधित मनसुख हिरेन (Mansukh Hiren) या व्यक्तीने आत्महत्या केली आहे. मनसुख यांनी कळवा पुलावरून उडी मारून आपला जीव दिला आहे. आता बातमी आहे की मनसुख हिरेन यांनी 2 मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. पत्रात त्यांनी, तपासाच्या निमित्ताने वारंवार बोलावून आपला मानसिक छळ करण्यात आला असल्याचे म्हटले आहे.
या कारचा मूळ मालक सॅम मुटेन नावाची व्यक्ती आहे. त्याने गाडीच्या इंटीरियरची देखभाल करण्यासाठी मनसुख हिरेन यांना आपली कार दिली होती. सॅमने पैसे न दिल्याने हिरेनने कार आपल्याच ताब्यात ठेवली होती. त्यानंतर ही गाडी चोरीला गेली व पुढे ती पुढे अंबानी यांच्या घरासमोर सापडली. कार चोरीला गेली असल्याची तक्रारही मनसुख यांनी केली होती. मात्र गाडी सापडल्यानंतर त्यांना वारंवार चौकशीसाठी बोलावण्यात आले.
या पत्रामध्ये हिरेन मनसुख यांनी लिहिले की, ‘पोलिस आणि माध्यमांकडून त्यांचा मानसिक छळ केला जात आहे. पुन्हा पुन्हा एकच प्रश्न विचारला जात आहे. मी सर्व प्रश्नांची आधीच उत्तरे दिले असूनही मला एकच प्रश्न विचारून त्रास दिला जात आहे.’ पुढे ते म्हणतात, ‘पीडित असूनही चौकशीत आरोपीसारखी वागणूक मिळत आहे. तसेच माध्यम प्रतिनिधींकडूनही फोन करून विनाकारण मानसिक छळ केला जात आहे.’ असे गंभीर आरोप मनसुख हिरेन यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केले आहे. या पत्राची प्रत मनसुख हिरेन यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख, ठाण्याचे पोलीस आयुक्त आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परवीर सिंह यांनाही पाठवल्याचे उघड झाले आहे. (हेही वाचा: Mukesh Ambani यांच्या घराबाहेर सापडलेल्या कारचा मालक मनसुख हिरेन यांची आत्महत्या; मुंब्रा येथील खाडीत सापडला मृतदेह)
मुकेश अंबानींच्या धमकी प्रकरणाची चौकशी आता महाराष्ट्र अँटी टेरर स्क्वॉड (एटीएस) करणार आहे. यापूर्वी केवळ हिरेन यांच्या मृत्यूची चौकशी महाराष्ट्र एटीएसकडे देण्यात आली होती. आता राज्य एटीएस या दोन्ही प्रकरणांची चौकशी करेल.
(The above story first appeared on LatestLY on Mar 06, 2021 04:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

