औरंगाबाद येथे 26 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने आकडा 1212 वर पोहचला
Coronavirus Outbreak | Representational Image | (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान देशभरासह महाराष्ट्रात घातले आहे. त्यामुळे दिवसागणिक कोरोनाबाधितांसह  बळींचा आकडा वाढत आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे हे कोरोनाच्या विखळ्यात अडकले गेले असून रेड झोन मध्ये त्यांना घोषित करण्यात आले आहेत. राज्यातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्या पाठोपाठ आता औरंगाबाद येथे सुद्धा कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्याचे दिसून येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 26 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1212 वर पोहचल्याची माहिती देण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाचा वेग संथ करण्यास यश आले असले तरीही त्याची साखळी अद्याप तुटलेली नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. तर कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी राज्य सरकारकडून पावले उचलली जात आहेत. विविध ठिकाणी कोविड आणि क्वारंटाइन सेंटर सुद्धा उभारले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी आता घरात बसून कोरोनाशी लढा देताना घराबाहेर पडताना सुद्धा सावधगिरी बाळगावी असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. रेड झोन मधील क्षेत्रात कोणतेही नियम शिथील करण्यात येणार नाहीत. परंतु येत्या काही काळात ग्रीन झोन मधील नियम शिथील करण्यात येण्याची शक्यता आहे.(Maharashtra Police: महाराष्ट्रात गेल्या 48 तासांत आढळले 278 पोलीस COVID-19 पॉझिटिव्ह, एकूण संख्या 1,666 वर)

दरम्यान, महाराष्ट्रात राज्यात काल दिवसभरात 2,345 नव्या रुग्णांची भर पडली असून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 41,642 इतकी झाली आहे. यात 1,454 रुग्णांचा मृत्यू झाला असून 11,726 रुग्ण बरे झाले आहेत. तर देशात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 1,18,447 वर पोहोचली असून एकूण 3583 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. भारतात सद्य स्थितीत 66,330 रुग्णांवर उपचार सुरु असून 48,534 रुग्ण बरे झाल्याची माहिती देखील आरोग्य विभागाकडून मिळत आहे.