Vande Bharat Mission: वंदेभारत अभियानाअंतर्गत 26 फ्लाईट्सच्या माध्यमातून 3 हजार 459 नागरिक महाराष्ट्रात
Air India | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Vande Bharat Mission: वंदेभारत अभियानाअंतर्गत (Vande Bharat Abhiyan) महाराष्ट्रात 26 फ्लाईट्सच्या माध्यमातून 3 हजार 459 नागरिक परत आले आहेत. यात मुंबईतील प्रवाशांची संख्या 1137 आहे. तर उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 1572 असून इतर राज्यातील प्रवाशांची संख्या 750 इतकी आहे. याशिवाय 7 जून 2020 पर्यंत आणखी 6 फ्लाईटस येणे अपेक्षित आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात ब्रिटन, सिंगापूर, फिलिपाईन्स, अमेरिका, बांग्लादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया या देशातून प्रवासी आले आहेत. (Coronavirus: यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी; जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची 124 वर पोहोचली)

दरम्यान, बृहन्मुंबईतील प्रवाशांना संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा हॉटेल्समध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर इतर जिल्ह्यातील तसेच राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली आहे. (हेही वाचा - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 41 हजार बस मधुन 5 लाखाहुन अधिक परराज्यातील नागरिकांची मुळगावी रवानगी, महाराष्ट्र सरकारने केला 94.66 कोटी खर्च)

दरम्यान, क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांवर प्रशासनाचे कडक लक्ष आहे. याशिवाय इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने 'वंदे भारत अभियान' यशस्वीपणे पार पाडत आहे.