'प्रियंका गांधी यांचा राजकारण प्रवेश काँग्रेससाठी ठरणार धनलक्ष्मीचे वरदान, संपणार अपूऱ्या पक्षनिधीची समस्या'
Priyanka Gandhi & Congress | (Photo credit: archived, edited, representative image)

सत्ताधारी भाजपच्या तुलनेत अपूऱ्या पक्षनिधीमुळे आर्थिक चणचणीत असणारी पक्षाध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालची काँग्रेस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या राजकारण प्रवेशामुळे कात टाकू शकते. प्रियंका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाचा काँग्रेसला राजकीय लाभ किती होईल हे इतक्यात सांगता येणार नाही. मात्र, पक्षनिधीची समस्या दूर करण्यासाठी मात्र त्यांचा काँग्रेसला चांगला फायदा होऊ शकतो, असे मत अमेरिकेतील एका बड्या मासिकाने व्यक्त केले आहे. हे मासिक परराष्ट्र संबंधांविषयी वार्तांकन करते.

कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीसचे मिलन वैष्णव यांनी 'फॉरेन पॉलिसी' (Foreign Policy) या प्रसिद्ध मासिकात एक लेख लिहिला आहे. या लेखात वैष्णव यांनी म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाची नवी सरचिटणीस (प्रियंका गांधी) आणि प्रचारक भलेही प्रत्यक्ष निवडणूक कदाचित लढवणार नाहीत. पण, काँग्रेस पक्षासाठी पक्षनिधीचे आर्थिक संकट दूर करण्यासाठी मात्र त्याचा नक्कीच फायदा होईल. काँग्रेससाठी सध्या पक्षनिधी उभारने हे मोठे आव्हान आहे. (हेही वाचा, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची ट्विटरवर एण्ट्री, पाहा कोणाला करतात फॉलो)

मिलन वैष्णव हे ‘कॉस्ट्स ऑफ डेमॉक्रेसी: पॉलिटिकल फाइनान्स इन इंडिया’ या पुस्तकाचे लेखक आहेत. हे पुस्तकही राजकीय वर्तुळात चांगलेच गाजले. त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या आर्थिक धोरण आणि विषयांसंबंधी त्यांनी व्यक्त केलेली मते गांभीर्याने घेतली जातात.

आपल्या लेखात वैष्णव म्हणतात, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली बहिण प्रियंका गांधी यांना योग्य वेळी राजकारणात सक्रीय केले. त्यांच्या राजकारण प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये एक वेगळा उत्साह आला. गेले काही काळ काँग्रेसमध्ये आलेली मरगळ प्रियंका यांच्या आगमनामुले हटण्यास मदत झाली. ज्याची आवश्यकता होती, असे वेष्णव यांनी म्हटले आहे.