Tech Layoffs: दररोज 3000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत टेक कंपन्या; जानेवारीमध्ये 65 हजारांहून अधिक लोकांनी गमावल्या नोकऱ्या
Job Layoff (Photo Credits: Twitter)

भारतासह जगभरात जानेवारी महिना रोजगाराच्या (Employment) दृष्टीने वाईट ठरत आहे. जगभरातील अनेक देशांवर मंदीचे (Financial Crisis) सावट दिसून येत आहे, ज्याचे गंभीर परिणाम कर्मचाऱ्यांना भोगावे लागत आहेत. जानेवारीमध्ये दररोज सरासरी 3,000 लोक टेक कंपन्यांमधील (Tech Companies) आपल्या नोकऱ्या गमावत आहेत. जागतिक आर्थिक संकट आणि मंदीच्या चिंतेमध्ये नोकरकपातीचा वेग वाढण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यात आतापर्यंत 166 टेक कंपन्यांनी 65,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.

गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटने 12,000 कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची योजना जाहीर केली आहे. मायक्रोसॉफ्टने 10,000 लोकांना नोकरीवरून काढून टाकण्याबाबत भाष्य केले आहे. तर Amazon ने देखील 18,000 लोकांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. यापैकी 1000 कर्मचारी भारतात कार्यरत आहेत. 2022 मध्ये, एक हजाराहून अधिक कंपन्यांनी 1,54,336 लोकांना कामावरून काढून टाकले. या सगळ्यात शेअरचॅटने एकूण कर्मचाऱ्यांपैकी 20 टक्के किंवा 500 लोकांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची योजना आखली आहे.

विप्रोने खराब कामगिरीमुळे 400 कर्मचाऱ्यांना काढून टाकले. सायबर सिक्युरिटी कंपनी Sophos ने भारतात 450 लोकांना कामावरून काढून टाकण्याची योजना जाहीर केली आहे, तर लिंकडीन (LinkedIn) ने लेऑफची योजना मांडली आहे. भारतात, एंड-टू-एंड डिजिटल हेल्थकेअर प्लॅटफॉर्म MediBuddy ने आपल्या 8 टक्के कर्मचारी किंवा सुमारे 200 लोकांना कामावरून काढून टाकले आहे. स्विगीने 380 लोकांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखली आहे. (हेही वाचा: Spotify Layoffs: टेक कंपनी खर्च कमी करण्यासाठी या आठवड्यात कामगारांना काढून टाकण्याची योजना आखत आहे)

उत्पादनात कपात आणि लहान युनिट्स बंद झाल्यामुळे सुरतमध्ये गेल्या काही महिन्यांत सुमारे 10,000 हिरे कामगारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. विपुल जिंजला या 31 वर्षीय हिरे व्यापारी यांनी गुरुवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. गेल्या काही महिन्यांपासून तो आर्थिक संकटात असल्याचे त्याच्या भावाने सांगितले. कामगार कायद्यांची कडक अंमलबजावणी करून फॅक्टरी अॅक्टच्या कक्षेत आणण्याची मागणी कामगार संघटना करत आहे. कामगारांची भविष्य निर्वाह निधी, कामाचे निश्चित तास आणि इतर सामाजिक आणि आरोग्य सुरक्षा लाभांची मागणी आहे. हिरे कामगारांना सामाजिक सुरक्षा नाही, असे कामगार संघटनेचे म्हणणे आहे. पगार स्लिप मिळत नाही आणि आयकर विवरणपत्रही भरले जात नाही.