Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही, शरद पवारांचे मोठं वक्तव्य
Sharad Pawar (Photo Credit - Twitter)

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील राजकीय गोंधळ संपण्याचे नाव घेत नाही. दरम्यान, दिल्लीत पोहोचल्यावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आम्ही इथे कोणाला भेटणार नाही, आमची बैठक आहे. यशवंत सिन्हा यांच्या उमेदवारीसाठी आम्ही येथे आलो आहोत. खरं तर, 27 जून रोजी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा दिल्लीत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शरद पवार दिल्लीत पोहोचले आहेत.

यासंदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले की, अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा विचार केला तर आपली अवस्था फार वाईट आहे असे नाही. आम्ही त्यांना शक्य तितकी मदत करू. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले की, मी संजय राऊत यांचे वक्तव्य ऐकले नाही. महाविकास आघाडीला आमचा पाठिंबा आहे आणि यापुढेही राहणार आहे. उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत साथ देऊ, असं आश्वासनही पवार यांनी दिलं आहे. (हेही वाचा - Sanjay Raut On Rebel MLA: गुवाहाटीतील 40 आमदार जिवंत प्रेत असून त्यांचे आत्मा मेले आहेत, ते परत आल्यावर त्यांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी थेट विधानसभेत पाठवले जातील; संजय राऊत यांची जहरी टीका)

राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, एकनाथ शिंदे नव्या युतीचे बोलले हे खरे आहे. पण आमच्या पक्षाचा विचार केला तर आमचे धोरण स्पष्ट आहे. आम्ही ठाकरे सरकारला पाठिंबा देत राहू. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल असे वाटत नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात राजकीय संघर्ष सुरू असताना शरद पवार यांनी दिल्ली गाठली आहे. आजच शिंदे गटाच्या आवाहनानंतर केंद्र सरकारने बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार, 25 जून रोजी एकनाथ शिंदे गटाने केंद्रीय गृहसचिव आणि राज्यपालांना पत्र लिहून सुरक्षा पुरवण्याची विनंती केली होती. या आमदारांना Y+ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे.