Pahalgam Terror Attack: कश्मीर मध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकार कडून विशेष विमानाची सोय; 6 मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी एक विशेष विमान वापरण्यात येणार आहे आणि त्याचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल असं जाहीर केले आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने अनेकांची पसंती जम्मू कश्मीर मध्ये फिरायला होती. पण पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने सध्या कश्मीर ठप्प झाले आहे. एका रिसॉर्टमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर खुला गोळीबार केल्यानंतर सध्या जम्मू कश्मीर मध्ये भीतीचं वातावरण आहे. अनेक पर्यटक जम्मू कश्मीर मध्ये अडकून पडले आहेत. या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा जागतिक स्तरातून निषेध होत आहे.नक्की वाचा: Pahalgam Terror Attack: काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी 'राज्य आपत्ती व्यवस्थापन'च्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन, जाणून घ्या दूरध्वनी क्रमांक.
महाराष्ट्र सरकार कडून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत
पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. हे सहाही पुरूष आहेत. आता त्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकार कडून प्रत्येकी 5-5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मृतांमध्ये अतुल मोने - डोंबिवली, संजय लेले - डोंबिवली, हेमंत जोशी- डोंबिवली, संतोष जगदाळे- पुणे, कौस्तुभ गणबोटे- पुणे, दिलीप देसले- पनवेल यांचा समावेश आहे. तर तीन जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.
सध्या श्रीनगरहून मुंबई तसेच अन्य राज्यात प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी तिकीटदर वाढविण्यात आल्याने अनेकांनी राग व्यक्त केला आहे. यामध्ये आता नागरी उड्डाण विभागाने देशभरातील एअरलाईन्सला तिकीट रद्द करण्याचे चार्ज आणि rescheduling चार्ज न लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, विमान कंपन्यांनी तिकीट दर न वाढविण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Apr 23, 2025 04:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

