भारताने पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडले,पण भारतीय वायुसेनेमधील 1 पायलट गायब -रवीश कुमार
विदेश मंत्रालय प्रवक्ता रवीश कुमार (Photo Credits-ANI)

भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) या दोन देशातील सध्याची स्थिती भयानक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षा सीमेवर हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्याचसोबत हवाई दलाला पाकिस्तानला प्रतिउत्तर देण्यासाठी तयार राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या परिस्थितीत विदेश मंत्रालयाने एका पत्रकार परिषदेचे आज बुधवारी (27 फेब्रुवारी) आयोजन करुन सध्याच्या परिस्थिती बाबात सांगितले आहे.

विदेश मंत्रालय प्रवक्ता रवीश कुमार आणि वायुसेना यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन असे सांगितले की, पाकिस्तानच्या एका लढाऊ विमान पाडले असून ते भारतीय सीमेवर कोसळले आहे. त्याचसोबत भारताच्या एका विमानाला अपघात झाल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामधील एक पायलट अद्याप गायब असल्याची माहिती कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.(हेही वाचा-भारतानं पाडलं पाकिस्तानंच एफ-16 विमान, पॅरेशूटच्या माध्यमातून पाकचे पायलट पळाले)

परंतु पाकिस्तानने भारतीय वायुसेनेच्या पायलटला पकडले असल्याचे वृत्त चालवत आहे. मात्र पाकिस्तानच्या या दाव्यावर तपासणी सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या सेनेने भारतीय सैन्याच्या विमानांचा खात्मा आणि दोन पायलट यांना अटक केल्याचे वृत्त सांगितले जात होते.

पाकिस्तानच्या सेनेने एक 46 सेकंदाचा व्हिडिओ समोर आणला असून त्यातील व्यक्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधली असून तो भारतीय वायुसेनेचा कमांडर असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओतील व्यक्ती हा मी वायुसेनेचा अधिकारी असून माझा सर्विस क्रमांक 27981 असा असल्याचे सांगत आहे. मात्र अद्याप या व्हिडिओची कोणत्याही प्रकारे पुष्टी करण्यात आलेली नाही.

भारताने बुधावारी जम्मू-काश्मिर मधील नौशेरा सेक्टर येथे नियंत्रण सीमारेषेजवळ आलेल्या पाकिस्तानच्या वायुसेनेचे एफ 16 वर हल्ला केला आहे. प्राप्त माहितीनुसार पाकिस्तानी लष्कराचे एफ-16 प्रकारातील हे विमान भारतीय हवाई हद्दीत 3 किलोमीटर आत आले होते. भारतीय हवाई हद्दीतून पाकिस्तानमध्ये परत जात असतान हे विमान पाकिस्तानच्या हद्दीतच पडले. विमान पडताना लोकांनी प्रत्यक्ष पाहिले.

महत्त्वाची टीप: भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित केलेले वृत्त लेटेस्टलीकडे प्राप्त झालेल्या माहितीवर आधारीत आहे. कोणत्याही निष्कर्षावर पोहचण्यापूर्वी किंवा सोशल मीडियावर संदेश प्रसारित करण्यापूर्वी वाचकांनी भारतीय लष्कराकडून अधिकृत माहिती मिळेपर्यंत प्रतिक्षा करावी अशी विनंती.