भारताचा कोविड 19 रिकव्हरी रेट 70% च्या जवळ; 24 तासांत सर्वाधिक 54,859 रूग्णांना डिस्चार्ज
Coronavirus| Representational Image| (Photo Credits: PTI)

भारतामध्ये आज 60 हजारांपेक्षा अधिक कोरोना रूग्ण 24 तासांत आढळले आहेत त्यासोबतच 1007 जणांचा दिवसभरात मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्रालयाने आज (10 ऑगस्ट) सकाळी दिल्यानंतर आता कोरोनामधून ठीक होणार्‍यांबाबतही महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. Ministry of Health & Family Welfare च्या माहितीनुसार देशात मागील 24 तासांत सर्वाधिक 54,859 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान देशाचा कोविड 19 रिकव्हरी रेटदेखील 70% च्या जवळ पोहचला आहे. भारतात कोरोनामुक्त रूग्णांनी 1.5 मिलियनचा टप्पा पार केला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेली दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कोविड 19 चा देशातील मृत्यूदर आता 2% आहे तसेच तो सातत्याने खाली येत आहे. देशात एकूण कोरोनामुक्त संख्या आणि सध्या देशात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णसंख्येमध्ये 9 लाखांचा फरक आहे. आता देशात अ‍ॅक्टिव्ह केस देखील कमी होण्यास सुरूवात झाली आहे. सध्या पॉझिटीव्ह रूग्णांच्या तुलनेत अ‍ॅक्टिव्ह रूग्णांचे प्रमाण 28. 66%इतके आहे.

ANI Tweet

भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा आज 22 लाख 15 हजार 75 पर्यंत पोहचला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान मागील 24 तासांत देशभरात 62,064 नवे रूग्ण समोर आले आहेत. तर सुमारे 1007 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान देशात अजूनही 6,34,945 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत भारतामध्ये 15,35,744 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 44,386 जणांची कोरोना सोबतची झुंज अपयशी ठरल्याने त्यांचा बळी गेला आहे.