COVID19 ची लक्षणे असलेल्या नागरिकांनी पुढे येण्याचे आरोग्य मंत्रालयाचे आवाहन
Coronavirus in India (Photo Credits: IANS)

देशभरात कोरोना व्हायरसने  (Coronavirus) थैमान घातले असल्याने लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून अहोरात्र उपचार केले जात आहेत. तसेच सरकारकडून सुद्धा कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना करण्यात येत आहे. लॉकडाउनच्या काळात नियमांचे पालन करण्यासोबत नागरिकांना घरातच थांबण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. याच दरम्यान आता ज्या नागरिकांमध्ये कोविड19 ची लक्षणे दिसून येत आहेत त्यांनी स्वत:हून पुढे यावे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अन्य जणांना होणार नाही असे आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून नागरिकांना करण्यात आले आहेत.

कोरोना व्हायरससंबंधित सरकारकडून विविध मार्गाने जनजागृती करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी कोरोनाच्या परिस्थितीत स्वत:सह परिवाराची सुद्धा काळजी घेण्यास सांगितले आहे. परंतु वयोवृद्ध व्यक्ती आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी या काळात अधिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. तर आतापर्यंत कोरोनाबाधित बळींचा आकडा पाहता बहुतांश हे वयोवृद्ध असल्याचे दिसून आले आहे.(Coronavirus in India: भारतात कोणत्या राज्यात किती आहे कोरोना संक्रमित रुग्ण, पाहा आजचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर)

दरम्यान, देशभरात आतापर्यंत 20917 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तसेच 44029 जणांवर अद्याप उपचार सुरु आहेत. गेल्या 24 तासात भारतात 4213 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 1559 जणांची प्रकृती सुधारली आहे. देशात रिकव्हरी रेट 31.15 टक्के असल्याचे ही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण आकडेवारी पाहता 67,152 वर आकडा पोहचल्याची माहिती लव अगरवाल यांनी दिली आहे.