चंद्राबाबू नायडू, मुख्यमंत्री आंध्र प्रदेश (Photo Credits: PTI)

Ageing Population in South India: भारतात सातत्याने वाढणारी लोकसंख्या हा चिंतेचा विषय आहे. सरकारही लोकांना जागरूक करण्यासाठी विविध प्रकारच्या मोहिमा राबवत आहे. मात्र आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (CM  Chandrababu Naidu) यांनी लोकांना अधिक मुलांना जन्म देण्याचे आवाहन केले आहे. चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील वृद्धांची वाढती लोकसंख्या आणि लहान मुलांच्या जन्माबाबत चिंता व्यक्त केली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री नायडू यांनी शनिवारी, 19 ऑक्टोबर रोजी अमरावती येथे सांगितले की, ‘आम्ही अधिक मुले असलेल्या कुटुंबांना प्रोत्साहन देण्याचा विचार करत आहोत. जेणेकरून विवाहित जोडप्यांना अधिक मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकेल.’

ते पुढे म्हणाले, ‘आम्ही दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यास प्रतिबंध करणारा कायदा रद्द करण्याचा विचार करत आहोत. आम्ही एक नवीन कायदा घेऊन येऊ, ज्या कायद्यानुसार दोनपेक्षा जास्त मुले आहेत तेच निवडणूक लढवण्यास पात्र असतील.’

चीन आणि जपानची उदाहरणे देत मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘आपल्याकडे लोकसंख्येचा फायदा केवळ 2047 पर्यंत आहे. 2047 नंतर, आंध्र प्रदेशात तरुणांपेक्षा अधिक वृद्ध लोक असतील. हे सध्या जपान, चीन आणि युरोपच्या अनेक देशांमध्ये होत आहे, त्यामुळे अधिक मुलांना जन्म देणे हे ही तुमची जबाबदारी आहे. हे केवळ स्वतःसाठीच नाही तर देशासाठीही फायदेशीर आहे.’ (हेही वाचा: Supreme Court on Indian citizenship: परदेशी नागरिकांची मुले पुन्हा भारतीय नागरिकत्व घेऊ शकत नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय)

सीएम चंद्राबाबू नायडू पुढे म्हणाले की, आता आंध्र प्रदेशसह दक्षिण भारतात वृद्धापकाळाची समस्या दिसू लागली आहे. ते म्हणाले की, तरुणांच्या स्थलांतरामुळे ही समस्या अधिकच गडद झाली आहे. तरुणांच्या शहरांकडे वळल्यामुळे आंध्र प्रदेशातील अनेक गावांमध्ये केवळ वृद्ध लोकच दिसतात. चंद्राबाबू नायडू म्हणाले की दक्षिणेकडील राज्यांमध्ये प्रजनन दर 1.6 आहे, जो राष्ट्रीय सरासरी 2.1 पेक्षा कमी आहे. याआधी 7 ऑगस्ट रोजी आंध्र प्रदेश सरकारने दोनपेक्षा जास्त मुले असलेल्यांना निवडणूक लढवण्यापासून रोखणारा कायदा रद्द केला.