26 जानेवारीपूर्वी सर्व बॉर्डरवर 15 दिवसांचा अलर्ट जारी; दहशतवादी सहा मार्गांनी करू शकतात हल्ले, 24 तास पाळत
Representational Image | (Photo Credits: PTI)

प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) निमित्ताने (26 जानेवारी) संपूर्ण देश अलर्ट आहे. या काळात दहशतवादी हल्ले (Terror Attack) होण्याची शक्यता असल्याने, विशेषतः आंतरराष्ट्रीय सीमेची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) भारत-पाकिस्तान सीमेवर 'ऑपरेशन सर्द हवा' सुरू केला आहे. यासाठी जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातच्या सीमेवर 15 दिवसांचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याला सामोरे जाण्यासाठी बीएसएफने सीमेवर सैन्यांची संख्या वाढविली आहे. गुरुवारी एसपी पूनम कर्मचार्‍यांसह नेपाळमधील गौरीफंटा सीमेवर पोहचल्या. यादरम्यान एसपीने, सुरक्षा यंत्रणेतील तैनात पोलिस आणि एसएसबीला 24 तास डोळ्यात तेल घालून पहारा देण्याच्या सूचना केल्या.

गुप्तचर अहवालानुसार 26 जानेवारी रोजी पाकिस्तान सीमेवरील 6 मार्गाने दहशतवादी हल्ले करू शकतात. पहिला, पाकिस्तानी दहशतवादी लॉन्च पॅडमधून अफगाणी आणि तालिबानी अतिरेक्यांच्या मदतीने घुसखोरी करू शकतात. पाकिस्तान रेंजर्स या दहशतवाद्यांना मदत करत आहेत. दुसरे म्हणजे पाकिस्तान ड्रोनद्वारे शस्त्रेही पाठवू शकतो. दहशतवादी कमांडर्स पाक सेना आणि आयएसआयच्या मदतीने शस्त्रे पाठविण्यासाठी प्री-प्रोग्राम केलेले ड्रोन वापरू शकतात.

तिसरा, पंजाब आणि राजस्थानमधील तस्करांच्या माध्यमातून, खलिस्तान समर्थक शस्त्रे पाठवू शकतात. चौथा, आयसीपी, अटारी सीमा, हुसेनीवाला सीमा आणि करतारपूर कॉरिडोर येथे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बीएसएफने या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा वाढविली आहे. पाचवा,  बीएसएफने जम्मूच्या 13 लहान नदी आणि 3 मोठ्या नद्यांमध्येही सतर्कता वाढविली आहे. बीएसएफने केवळ जम्मूच नव्हे, तर पंजाबमधील नद्यांच्या भागातही अलर्ट जारी केला आहे. या भागात इलेक्ट्रॉनिक पाळत ठेवणेही वाढविण्यात आले आहे. (हेही वाचा: Coronavirus च्या पार्श्वभुमीवर लखनौ, मुंबई येथील विमानतळावर थर्मल स्कॅनर यंत्रणा कार्यान्वित)

सहावा, लष्करमधील दहशतवादी गुजरातमधील हरामी नाल्याच्या भागात घुसू शकतात. यामुळे बीएसएफने वेगवान हल्ल्याच्या क्राफ्टचा वेग, सर्व वाहने तसेच सैन्यांची संख्या वाढविली आहे.