DGMO Lieutenant General Rajiv Ghai | ANI

Press Briefing on Operation Sindoor: भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर (India-Pakistan Ceasefire) लष्कराने ऑपरेशन सिंदूरबाबत (Operation Sindoor) महत्त्वाची माहिती दिली आहे. डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई (DGMO Lt General Rajeev Ghai) यांनी सांगितले की, दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले. दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने स्पष्ट केले आहे की, दहशतवादाला आता केवळ निर्णायक लष्करी कारवाईनेच उत्तर दिले जाईल.

30-40 पाकिस्तानी सैनिक मारले गेले -

डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, काही एअरफील्डवर वारंवार हवाई हल्ले झाले पण सर्व हल्ले परतवून लावण्यात आले. पाकिस्तानी लष्कराकडून सांगण्यात आले आहे की 7 ते 10 मे दरम्यान नियंत्रण रेषेवर तोफखाना आणि लहान शस्त्रांच्या गोळीबारात पाकिस्तानी लष्कराचे सुमारे 35 ते 40 सैनिक मारले गेले. (हेही वाचा - PM Modi Warns To Pakistan: ‘वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा'; युद्धबंदीच्या घोषणेनंतर पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा)

एअर मार्शल ए.के. भारती यांनी सांगितले की, 8 आणि 9 ला रात्री 10:30 वाजल्यापासून श्रीनगरपासून नालियापर्यंत ड्रोन आणि मानवरहित हवाई वाहनांनी आपल्या शहरांवर मोठ्या प्रमाणात हल्ला केला. पण आम्ही सज्ज होतो आणि आमच्या हवाई संरक्षण तयारीमुळे जमिनीवरील कोणत्याही लक्ष्याचे किंवा शत्रूने नियोजित केलेल्या कोणत्याही लक्ष्याचे नुकसान झाले नाही याची खात्री झाली. आम्ही वेळीच प्रत्येक संभाव्य धोक्याला निष्प्रभ केले.  (हेही वाचा - India-Pakistan Tensions: 'काश्मीर हा बायबलमधील 1000 वर्ष जुना संघर्ष नाही'; अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump यांचा मध्यस्थीचा प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला)

भारतीय लष्कराने फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य केले -

एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी पुढे सांगितलं की, भारतीय हवाई दलाने अतिशय काळजीपूर्वक फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरच लक्ष केंद्रित केले आणि कोणत्याही नागरिकाची जीवितहानी होऊ दिली नाही. आम्ही संपूर्ण योजना अशा प्रकारे बनवली होती की फक्त दहशतवादी छावण्यांवरच अचूक हल्ला होईल आणि कोणत्याही नागरिकाचे नुकसान होणार नाही.

बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त -

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बहावलपूर येथील दहशतवादी तळावर अचूक क्षेपणास्त्र हल्ला केला. हा परिसर जैश-ए-मोहम्मदचा मुख्य लपण्याचा ठिकाण मानला जातो. भारतीय हवाई दलाचे डीजी एअर ऑपरेशन्स एअर मार्शल एके भारती यांनी हल्ल्याचे ड्रोन आणि सॅटेलाइट फुटेज दाखवले.

100 दहशतवादी मारले गेले -

याशिवाय, डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरचे उद्दिष्ट फक्त दहशतवाद्यांचा खात्मा करणे आहे. आम्ही 100 दहशतवाद्यांना ठार मारले. लष्कराने दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. आयसी 814 च्या अपहरणात आणि पुलवामा बॉम्बस्फोटात सहभागी असलेले युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदासिर अहमद सारखे मोठे दहशतवादी मारले गेले. त्यानंतर लगेचच पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेचेही उल्लंघन करण्यात आले. आपल्या शत्रूच्या अनियमित आणि घाबरलेल्या प्रतिक्रियेवरून हे स्पष्ट झाले की ते मोठ्या संख्येने नागरिक, वस्ती असलेली गावे आणि गुरुद्वारासारख्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करतील आणि दुर्दैवाने अनेक लोक त्यांच्या हल्ल्याचे बळी पडले. तथापि, भारतीय हवाई दलाने या हल्ल्यांना योग्य उत्तर दिले आणि त्यांच्या अनेक छावण्यांवर हल्ला केला.