मध्य प्रदेशमध्ये उद्भवला नवा वाद; कॉंग्रेसने बंद केली 'वंदे मातरम्' म्हणण्याची प्रथा

कॉंग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांनी भाजप सरकारने सुरु केलेली ‘वंदे मातरम’ म्हणण्याची प्रथा बंद केली आहे

मध्य प्रदेशमध्ये उद्भवला नवा वाद; कॉंग्रेसने बंद केली 'वंदे मातरम्' म्हणण्याची प्रथा
कमलनाथ (Photo Credits: IANS)

सरत्या वर्षात मध्य प्रदेश (Madhya Pradesh) मध्ये कॉंग्रेसची सत्ता आल्यानंतर, आता नव्या वर्षाच्या मुहूर्तावर मध्य प्रदेशमध्ये एका नव्या  वादाला तोंड फुटले आहे. कॉंग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांनी भाजप सरकारने सुरु केलेली ‘वंदे मातरम्’ म्हणण्याची प्रथा बंद केली आहे. यासाठी त्यांनी कोणतेही ठोस कारण दिले नाही. तसेच एक दिवस वंदे मातरम् म्हटले नाही म्हणून तो व्यक्ती देशभक्त ठरत नाही का? असा सवालही उपस्थित केला आहे. याचसोबत लवकरच हा नियम पुन्हा लागू करू असेही सांगितले आहे.

दहा वर्षांपूर्वी भाजप सरकारच्या काळात मध्यप्रदेशमध्ये, दर महिन्याच्या 1 तारखेला वंदे मातरम् म्हणण्याची प्रथा सुरु करण्यात आली होती. मात्र आता मध्य प्रदेशमध्ये कॉंग्रेसचे सरकार आल्यानंतर वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही प्रथा बंद करण्यात आली. या निर्णयाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून, भाजपकडून यावर टीकादेखील होत आहे.

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काँग्रेसने ही प्रथा पुन्हा सुरु करावी, अशी मागणी केली आहे. मात्र कमलनाथ आपल्या निर्णयावर ठाम आहेत. ‘एक दिवस वंदे मातरम् म्हटल्याने कोणी देशभक्त ठरत नाही. आम्ही या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. एका नव्या स्वरूपात लवकरच या प्रथेची परत अंमलबजावणी सुरु होईल’, असे कमलनाथ यांनी सांगितले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 02, 2019 08:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).