राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष पदावर कायम; पक्षाच्या कार्यकारिणी समितीने फेटाळला राजीनामा; देशभरात प्रादेशिक नेतृत्व बदलाचे संकेत
Congress Working Committee(CWC) meeting at party office | (Photo Credits: ANI / Twitter)

Lok Sabha Election Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 मध्ये झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पक्ष अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ केला. मात्र, काँग्रेस कार्यकारिणी समितीने हा राजीनामा फेटाळला आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक दिल्ली येथे पार पडत आहे. या बैठकीस युपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, पक्ष सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह मल्लीकार्जून खर्गे, गुलाम नबी आझाद, मुकूल वासनीक यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षात मोठी उलथापालथ सुरु आहे. त्यामुळे पक्षापुढे नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पराभवाची जबाबदारी स्वीकारत स्वत: पक्षाध्यच जर राजीनाम्याच्या तयारीत असतील तर, त्याचे पडसाद देशातील इतर राज्यांमध्येही उमटण्याची शक्यता आहे. मात्र, काँग्रेस कार्यकारिणीनेच राहुल यांचा राजीनामा फेटाळल्याने सध्यातरी राहुल हेच पक्षाध्यक्ष राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, विविध राज्यांतील नेतृत्वात मात्र या बैठकीनंतर फेरबदल करण्यात येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणही आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस (Congress) अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यावर राहुल गांधी (Rahul Gandhi ) ठाम असल्याची सूत्रांची माहिती होती. काँग्रेसच्या गोटातून मात्र अद्याप या राजीनाम्याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नव्हता. राहुल यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला तर कार्यकारी समिती खरोखरच हा राजीनामा  स्वीकारणार का? याबाबत मात्र उत्सुकता होती. जी आता संपली आहे.

एएनआय ट्विट

लोकसभा निवडणुकीत देशभरात झालेल्या सर्वाव्यापी पराभव पाहून काँग्रेस पक्ष (Congress Party) हादरुन गेला आहे. काँग्रेसने ही निवडणूक पक्षाध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली लढली होती. या निवडणुकीत काँग्रेसने प्रियंका गांधी यांनाही मर्यादीत स्वरुपात मैदानात उतरवले होते. अनेक प्रयत्न करुनही काँग्रेस ही निवडणूक हारली. भाजपचा देशभरात प्रचंड मोठा विजय झाला. या पार्श्वभूमिवर काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी समिती (Congress Working Committee) आज (25 मे 2019) नवी दिल्ली येथे बैठक घेत आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाचे विश्लेषण या बैठकीत करण्यात येणार आहे. या बैठकीस काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, या बैठकीत राहुल गांधी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एएनआय ट्विट

दरम्यान, राहुल गांधी यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु होताच काँग्रेसमधील काही नेते राहुल गांधी याचा बचाव करण्यासाठीही पुढे आले आहेत. मुंबई काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी राहुल गांधी यांना पाठींबा देत त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये असे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी काँग्रेसने रणनिती ठरवली होती. ही रणनिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्याची होती. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार रणनितीनुसार नरेंद्र मोदी यांना घेरण्यावरच केंद्रीत राहिला. मात्र, त्याचा पक्षाच्या विजयासाठी काहीच उपयोग झाला नाही. थेटच सांगायचे तर, काँग्रेसची रणनिती सपशेल फोल ठरली. या पार्श्वभूमीवर पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. (हेही वाचा, दिल्ली: राहुल गांधी देणार अध्यक्ष पदाचा राजीनामा? काँग्रेस कार्यकारी समिती बैठकीत प्रस्ताव ठेवण्याची शक्यता)

दरम्यान, या बैठकीमध्ये काँग्रेसची सत्ता असलेल्या पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतही चर्चा केली जाणार असल्याचे समजते. तसेच, विविध राज्यांमध्ये पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये असलेल्या वादविवादांवरही चर्चा होणार असल्याचे समजते. यात प्रामुख्याने पंजाब राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि मंत्री नवज्योत सिंह सिद्धू, महाराष्ट्र काँग्रेसमधील सुंदोपसुंदी अशा एक ना अनेक गोष्टींवर चर्चा कोली जाऊ शकते. (हेही वाचा, महाराष्ट्रात शिवसेनेचा आवाज वाढला, जाणून घ्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांना किती टक्के मतं मिळाली?)

दरम्यान, या बैठकीत काय चर्चा होते या पेक्षा सर्वाधिक उत्सुकता आहे की, राहुल गांधी हे खरोखरच आपल्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का? तसेच, राहुल गांधी यांनी पक्षाचा राजीनामा दिलाच तर तो राजीनामा पक्ष आणि काँग्रेसचे धुरीण स्वीकारणार का? प्रश्न बरेज आहेत. जे अद्याप गुलदस्त्यात आहेत. काँग्रेस बैठकीत त्यावर चर्चा होईल असे संकेत आहेत.