BSF जवानांना कुटुंबासोबत एका वर्षात 100 दिवस घालवण्यास मिळावे, यासाठी सरकार प्रयत्न करणार - केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय
Union Home Minister Nityanand Rai (PC-ANI)

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना (Border Security Force) कुटुंबासोबत राहण्यासाठी एका वर्षात 100 दिवस मिळावेत. तसेच जवानांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय (Union Home Minister Nityanand Rai) यांनी सांगितले आहे. राय दिल्लीतील 'बीएसएफ'च्या 55 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बीएसएफ जवानांनी संचलन करत शक्तीप्रदर्शन केले. या कार्यक्रमाला बीएसएफचे महासंचालक विवेक कुमार जोहरी (Vivek Kumar Johari) उपस्थित होते.

देशातील जवानांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाला चालना देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. आता बीएसएफ जवानांच्या निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात आले आहे. तसेच ज्या जवानांची नेमणूक काश्मीरमध्ये झाली आहे, अशा जवानांना जम्मू ते दिल्लीपर्यंतचा विमान प्रवास मोफत देण्यात आला आहे, असेही राय यांनी सांगितले. (हेही वाचा - BSF जवानाच्या प्रसंगावधानतेमुळे हृद्यविकाराचा त्रास होत असलेल्या जवानांचे वाचले प्राण; ट्विटरवर कौतुकाचा वर्षाव)

ज्या सैनिकांना वीरमरण आले आहे, अशा सैनिकाच्या कुटुंबाला दिल्लीमध्ये कमी किंमतीत 1 बीएचके फ्लॅट देण्यात येणार आहे. तसेच 'निमलष्करी दल वेतन योजने'नुसार, जवानांचा अपघाती विमा वाढवण्यात येणार आहे, असे बीएसएफचे संचालक विवेक कुमार जोहरी यांनी सांगितले.