Ropeway Accident in Deoghar: झारखंडमधील देवघर जिल्ह्यात 2 हजार फूट उंचीवर अडकले 50 पर्यटक; 2 महिलांचा मृत्यू, बचाव कार्य सुरू
Ropeway Accident in Deoghar (PC - Twitter)

Ropeway Accident in Deoghar: झारखंडमधील देवघर येथे रविवारी सायंकाळी झालेल्या रोपवे दुर्घटनेत 2 महिलांना जीव गमवावा लागला असून, सुमारे 50 पर्यटक अजूनही 2000 फूट उंचीवर अडकले आहेत. सुमारे 20 तास उलटूनही या पर्यटकांना खाली उतरवता आलेले नाही. बचाव मोहिमेवर हवाई दलाची दोन हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आली आहेत. मात्र, तारांमुळे हेलिकॉप्टरपर्यंत ट्रॉली पोहोचण्यात अडचणी येत आहेत. लोकांपर्यंत अन्न किंवा पाणी पोहोचवण्यासही अडचण येत आहे.

देवघरपासून 22 किमी अंतरावर असलेल्या त्रिकूट डोंगरावर रविवारी सायंकाळी मोठा अपघात झाला. रामनवमीनिमित्त मोठ्या संख्येने आलेले पर्यटक रोपवेवर स्वार होऊन थरार अनुभवत होते. त्यानंतर तार तुटल्याने एक ट्रॉली खाली पडली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला. तसेच अनेक पर्यटक जखमी झाले. बचावलेल्या 7 जखमींना देवघर सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एक बालक आणि एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. 12 ट्रॉलीमध्ये सुमारे 50 लोक अडकले आहेत. (हेही वाचा - Bihar: बिहारमध्ये चक्क 60 फुट लांबीचा पूल चोरीला; सूत्रधारासह दोन सरकारी अधिकारी आणि 8 आरोपींना अटक)

रात्री उशिरापर्यंत प्रवाशांना सुखरूप उतरविण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र उंचीसह अंधार असल्याने त्यांना बाहेर काढण्यात अडचण येत होती. सकाळी लष्कराला मदतीसाठी पाचारण करण्यात आले. हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरच्या मदतीने पर्यटकांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रत्येकजण पर्यटकाच्या संपर्कात असल्याचे देवघरचे उपायुक्त मंजुनाथ भजंत्री यांनी सांगितले. हवाई दलाची 2 हेलिकॉप्टर आली आहेत. भारतीय लष्कर, एटीबीपी, एनडीआरएफ आणि भारतीय हवाई दलाचे विशेष कमांडो त्यांची सुटका करतील. सर्वजण समन्वयाने काम करत आहेत, असंही भजंत्री यांनी सांगितलं आहे.