
नोबेल शांतता पुरस्कार जिंकण्याची इच्छा उघडपणे व्यक्त करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी, वारंवार माध्यमांमध्ये उपस्थित राहून आपण भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. आता नेदरलँड्समधील हेग येथे आयोजित नाटो परिषदेत पुन्हा एकदा ट्रम्प यांनी या दाव्याची पुनरावृत्ती केली. त्यांनी सांगितले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संघर्ष हा ‘खूपच गंभीर’ झाला होता आणि आपण तो व्यापार चर्चेच्या माध्यमातून संपवला.
ट्रम्प यांनी या संघर्षाला अण्वस्त्रयुद्धापासून वाचवल्याचा दावा केला, आणि यासाठी त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानच्या लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांचे कौतुक केले. मात्र, भारताने ट्रम्प यांच्या या दाव्याला स्पष्टपणे नाकारले असून, 10 मे 2025 रोजी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमधील थेट चर्चेतूनच हा तणाव कमी झाल्याचे म्हटले आहे.
नेदरलँड्समधील हेग येथे नाटो परिषदेच्या पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्याशी व्यापार चर्चेच्या माध्यमातून संपर्क साधला आणि दोन्ही देशांना युद्ध थांबवण्यास भाग पाडले. ते म्हणाले, मी फोन कॉल्सद्वारे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवले. मी त्यांना सांगितले, जर तुम्ही एकमेकांशी लढणार असाल, तर आम्ही कोणताही व्यापार करणार नाही. पाकिस्तानचे जनरल माझ्या कार्यालयात आले होते, आणि पंतप्रधान मोदी माझे चांगले मित्र आहेत. मी त्यांना समजावले, आणि युद्ध थांबले.
#WATCH | Hague, Netherlands: US President Donald Trump says "...The most important of all, India and Pakistan...I ended that with a series of phone calls on trade. I said if you're going to go fighting each other, we're not doing any trade deal. The General from Pakistan was in… pic.twitter.com/xQpQl86jbA
— ANI (@ANI) June 25, 2025
त्यांनी असाही दावा केला की, या संघर्षामुळे लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकला असता, आणि तो अण्वस्त्रयुद्धाकडे वळला असता. ट्रम्प यांनी या यशाचे श्रेय अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हॅन्स आणि परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनाही दिले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने वाढला, ज्यामध्ये 26 नागरिकांचा मृत्यू झाला.
भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले आणि 7 मे 2025 रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने रतीय लष्करी तळांवर हल्ले केले. या तणावामुळे दोन्ही देशांमधील सीमेवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची देवाणघेवाण झाली. नंतर 10 मे 2025 रोजी दोन्ही देशांच्या लष्करी संचालकांनी (DGMOs) थेट चर्चा करून युद्धविरामाची घोषणा केली. भारताने यामध्ये अमेरिकेची कोणतीही मध्यस्थी नसल्याचे स्पष्ट केले.