'वन्दे भारत' अभियानाअंतर्गत अमेरिकेत अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एअर इंडियाच्या 7 फ्लाईट्सची घोषणा; येथे पहा 11-15 मे दरम्यान होणाऱ्या उड्डाणांची यादी
Air India | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे भारतीय नागरिक अमेरिकेतील विविध भागात अडकून पडले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी भारताने 'वन्दे भारत' अभियान सुरु केले आहे. त्या अंतर्गत एअर इंडियाची पहिल्या टप्प्यातील उड्डाणे 9-15 मे दरम्यान होणार आहेत. त्या उड्डाणांना सुरुवात झाली असून न्यु जर्सी हून मुंबई, अहमदाबाद या ठिकाणी परतण्यासाठी 5 फ्लाईट्स सज्ज झाल्या आहेत. तसंच अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी वॉशिंग्टन मधील भारतीय दूतावासाने Travel Advisory जारी केली आहे. त्यानुसार प्रवासापूर्वी नागरिकांचे स्क्रिनिंग करण्यात येणार आहे.

यातील पहिले फ्लाईट सॅन फ्रान्सिस्को वरुन शनिवारी (9 मे) मुंबई आणि हैद्राबादसाठी रवाना झाले. तर रविवार (10 मे)  न्यु जर्सीच्या Newark Liberty International Airport वरुन मुंबई आणि अहमदाबाद शहरांसाठी उड्डाणे होणार आहेत. त्या पुढील उड्डाण 14 मे रोजी नेवार्क हून दिल्ली आणि हैद्राबाद शहारातील नागरिकांना परत आणण्यासाठी होणार आहे. 11 मे रोजी शिकागोपासून मुंबई आणि चेन्नईला उड्डाणे होतील. तर 15 मे रोजी हैद्राबाद, दिल्ली शहरांसाठी फ्लाईट्सची सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 12 मे रोजी केवळ एकच उड्डाण दिल्ली आणि हैद्राबाद शहरांसाठी होणार आहे. (लॉकडाऊनमुळे अमेरिकेत अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परतण्यासाठी 9-15 मे दरम्यान एअर इंडियाची विशेष उड्डाणे; भारतीय दूतावासाने जारी केली Travel Advisory)

भारत सरकारच्या नियमांनुसार, प्रवास करण्यापूर्वी प्रत्येक प्रवाशाची मेडिकल स्क्रिनिंग करण्यात आहे. तसंच भारतात परतल्यानंतरही स्क्रिनिंग होईल. भारतात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आरोग्य सेतू डाऊनलोड करुन त्यात रजिस्टर करणे अनिवार्य आहे. भारतात परतल्याने प्रत्येक प्रवाशाला 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहणे देखील गरजेचे आहे. तसंच 14 दिवसांनंतर प्रत्येक प्रवाशाची कोविड 19 ची तपासणी करण्यात येईल आणि त्यानंतर पुढील उपाययोजना करण्यात येतील. भारतात नागरिकांना परत आणण्यासाठी विद्यार्थी, गरोदर महिला आणि वृद्ध व्यक्ती यांना विशेष प्राधान्य दिले जाईल.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात परत आल्यानंतर 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागले म्हणून अनेकांनी भारतात परण्यासाठी केलेले रजिस्ट्रेशन रद्द केले आहे. अशा नागरिकांची संख्या अधिक असल्यास वन्दे भारत मिशनचा कालावधी वाढवावा लागेल. आतापर्यंत 'वन्दे भारत' मिशन अंतर्गत भारताने युके आणि आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांना परत आणले आहे. तसंच येत्या काही दिवसांत 12 विविध देशांमधून सुमारे 15000 नागरिकांना परत आणण्यात येणार आहे.