IND vs AUS, 3rd T20: पावसामुळे हैदराबादमध्ये मालिका जिंकण्याचे स्वप्न होवू शकते भंग? जाणून घ्या खेळपट्टी आणि हवामानाची स्थिती
Photo Credit - Twitter

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS T20 Series) मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना रविवारी हैदराबादमध्ये (Hyderabad) खेळवला जाणार आहे. मात्र, नागपूर सामन्याप्रमाणे येथेही पावसाची शक्यता आहे. मालिका जिंकण्याचे त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त होऊ नये, अशी भीती चाहत्यांना आहे. पावसामुळे सामना रद्द होऊ शकतो किंवा षटके कमी केली जाऊ शकतात. आज पावसाची मुबलक शक्यता असून, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. शहरात शनिवारीही चांगला पाऊस झाला. मात्र, चांगली बाब म्हणजे रविवारी दुपारनंतर पाऊस पडणार नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसाचा अडथळा न आल्यास सामना योग्य वेळी सुरू होईल. तापमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे आणि वारा 19 किमी/तास वेगाने वाहतील.

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शेवटचा सामना तीन वर्षांपूर्वी 2019 मध्ये झाला होता. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यात धावांचा पाऊस पडत होता. दोन्ही संघांनी षटकार आणि चौकार मारले. या सामन्याच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर, फलंदाज पुन्हा एकदा आक्रमक होवू शकतात. (हे देखील वाचा: IND vs AUS 3rd T20I Live Streaming Online: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया निर्णायक सामन्यात कोण जिंकणार? कधी आणि कुठे पाहणार सामना घ्या जाणून)

कशी आहे खेळपट्टी?

पिच क्युरेटरकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी-20 मध्ये ही खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त ठरेल. गोलंदाजांना विकेट घेण्यासाठी आणि धावा रोखण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. हैदराबादची सरासरी 160 धावांची आहे. मात्र, 2019 मधील शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 207 धावा केल्या होत्या आणि टीम इंडियाने आव्हानाचा पाठलाग केला होता. दोन्ही संघातील फलंदाजांचे प्रकार पाहता या खेळपट्टीवर 180 ते 200 च्या दरम्यान धावसंख्या झाल्यातर आश्चर्यचकित होण्याची गरज नाही.