T20 World Cup Team India Squad: श्रेयस अय्यरची जागा Ishan Kishan ला देण्यामागे एक विशेष हेतू, मुख्य निवडकर्ता चेतन शर्माने केला खुलासा
ईशान किशन व श्रेयस अय्यर (Photo Credit: PTI)

T20 World Cup Team India Squad: माजी भारतीय क्रिकेटपटू चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआय (BCCI) निवड समितीने बुधवारी आयसीसी टी-20 विश्वचषक (T20 World Cup) 2021 स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची (Indian Team) घोषणा केली. शिखर धवन आणि युजवेंद्र चहल सारख्या अनुभवी खेळाडूंना संघात स्थान मिळाले नाही. दोघे अलीकडेच मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर गेले होते. याशिवाय श्रेयस अय्यरलाही (Shreyas Iyer) संघात स्थान मिळाले नाही, त्याच्या जागी ईशान किशनचा (Ishan Kishan) समावेश करण्यात आला आहे. अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) चार वर्षानंतर टी-20 आंतरराष्ट्रीय संघात परतला आहे. श्रेयस अय्यरबद्दल बोलायचे झाले तर मार्चमध्ये इंग्लंडविरुद्ध घरेलू मालिकेच्या पहिल्या वनडेमध्ये त्याला खांद्याला दुखापत झाली होती, ज्याच्यावर नंतर शस्त्रक्रिया करावी लागली. अय्यरला मुख्य संघात स्थान मिळाले नाही मात्र, राखीव खेळाडू म्हणून त्याची निवड झाली आहे. अय्यरच्या जागी ईशान किशनला प्राधान्य देण्याबाबत शर्मा यांनी कारणही सांगितले आहे. (T20 World Cup: टीममध्ये सिलेक्शन झाल्यानंतर इशान किशन आणि चहरची प्रतिक्रिया, MI च्या खेळाडूंनी केले अभिनंदन, पहा व्हिडीओ)

चेतन शर्मा म्हणाले की, ईशानने श्रेयस अय्यरची जागा संघात घेतली आहे. ते म्हणाले, “ईशान किशन सलामीवीर म्हणून आणि मधल्या फळीतही फलंदाजी करू शकतो. तो आम्हाला खेळाडू म्हणून बरेच पर्याय देतो. तो एकदिवसीय सामन्यात सलामीला आला आहे आणि त्या सामन्यात त्याने अर्धशतकही केले आहेत. मधल्या ओव्हरमध्ये फिरकी चेंडू खेळण्यासाठीही तो एक चांगला खेळाडू आहे.” शर्मा पुढे म्हणाले, “डावखुरा फलंदाजही महत्त्वाचा होता. लेग स्पिनर्स जेव्हा विरोधी संघासाठी गोलंदाजी करत असतात, तेव्हा ईशान किशनसारख्या आक्रमक फलंदाजाची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. श्रेयस अलीकडच्या काळात जास्त क्रिकेट खेळला नाही, म्हणून आम्ही त्याला स्टँडबाय म्हणून ठेवले आहे, पण ईशान किशनला संघात स्थान मिळाले आहे.” किशन, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंत हे गेम चेंजर खेळाडू आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा सारखे एक टोक सांभाळत असताना भारताला भक्कम मधल्या फळीची गरज आहे जे पटकन धावा करू शकतील. तसेच किशन आणि सूर्यकुमार दोघेही अय्यरपेक्षा बहुमुखी पर्याय आहेत.

दुसरीकडे, श्रेयस अय्यर सुरुवातीच्या 15 जणांच्या संघात नसला तरी तो स्टँड-बाय खेळाडूंपैकी एक आहे. अशा स्थितीत अय्यरला प्रभावित करण्यासाठी छोटीशी संधी आहे. 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएल 2021 चा दुसरा भाग दुसरा टप्पा सुरु होणार आहे आणि 26 वर्षीय फलंदाजाला निवडकर्त्यांना आपली योग्यता दाखवून देण्याची संधी देतो. यासाठी त्याला त्याच्या खेळण्याच्या शैलीत मोठ्या प्रमाणात बदल करावा लागेल.