India vs Australia 1st ODI 2019: T20 मालिका पराभवाचा वचपा काढण्याची भारताला विश्वचषक स्पर्धेपूर्वी शेवटची संधी
टीम इंडिया (Photo Credits: IANS)

India vs Australia 1st ODI 2019: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून (शनिवार, 2 मार्च 2019) सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिलाच सामना हैदराबाद (Hyderabad) येथील राजीव गांधी अंतर्राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (Rajiv Gandhi International Cricket Stadium)मध्ये खेळला जाणार आहे. विश्वचषक स्पर्धेपूर्वीचा हा शेवटचाच सामना असल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाला जबाबदार खेळी करावी लागणार आहे. तसेच, T20 सीरीज पराभवाचा बदला घेण्याचीही मोठी संधी या मालिकेमुळे भारताला मिळणार आहे. जबाबदार खेळी करत भारतीय संघ या संधीचे कसे सोने करतो याबाबत उत्सुकता आहे. क्रिकेटप्रेमींसाठी महत्तवाची माहिती अशी की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याचे प्रसारण भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजलेपासून सुरु होईल.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतीय संघासोबत खेळलेल्या दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत (T-20 Series) 2-0 अशी आघाडी घेऊन भारताचा पराभव केला होता. या सामन्यात ( T20) भारतातने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेत निर्धारित षकटांमध्ये ऑस्ट्रेलियासमोर 127 धावांचे लक्ष्य ठेवले. हे लक्ष ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी सहज पार केले.

दुसऱ्या टी-20 मालिकेत भारतीय संघाने कर्णधार विराट कोहली, धोनी आणि सलामीवीर लोकेश राहुल यांच्या शानदार खेळीने 191 इतकी धावसंख्या उभारली. मात्र, ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर खेळाडू ग्लॅन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने शानदार शतक झळकावत भारतीय संघाकडून विजय खेचून घेतला. (हेही वाचा, माजी क्रिकेटपटू सनथ जयसुर्या याच्यावर ICC कडून कारवाई,भ्रष्टाचारविरोधात नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी दोन वर्षे बंदी)

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु होणाऱ्या पाच एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना 5 मार्च रोजी नागपूर येथे, तिसरा सामना 8 मार्चला रांची येथे, चौथा सामना 10 मार्चला आणि अंतिम सामना 13 मार्च रोजी दिल्ली येथे खेळला जाईल.