IND vs SL 2nd T20I: इंदोर टी-20 मध्ये बनले 10 प्रमुख रेकॉर्ड; जसप्रीत बुमराह, विराट कोहली यांनी मिळवले अव्वल स्थान, वाचा सविस्तर
जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) संघातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी-20 सामना मंगळवारी इंदोरच्या होळकर स्टेडियम (Holkar Stadium) मध्ये खेळला गेला. भारतीय कर्णधार विराट कोहली याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि श्रीलंकाने 142 धावा केल्या. श्रीलंकाने दिलेल्या धावांचा पाठलाग करत भारताने 3 विकेट गमावून आणि 3 ओव्हर राखून लक्ष्य पूर्ण केले. 17.3 ओव्हरमध्ये 3 गडी गमावून भारताने मिळवलेले सोप्पे लक्ष्य गाठले आणि तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दोन्ही संघातील पुढील सामना 10 जानेवारीला पुणे स्टेडियममध्ये खेळला जाईल. या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांच्यापासून केएल राहुल आणि श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगा यांनीही विक्रमांची नोंद केली. आज आपण त्याबद्दल जाणून घेऊया: (Video: इंदोर सामन्यात श्रेयस अय्यर याने सर्वात मोठा सिक्स मारलेला पाहून विराट कोहली याने दिली अशी प्रतिक्रिया, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाला Wow)

1. आंतरराष्ट्रीय टी -20 सामन्यात कर्णधार म्हणून विराटने 1000 धावा पूर्ण केल्या. विराटने 32 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात टीम इंडियानेतृत्व केले. यापैकी 19 सामने जिंकले असून 11 पराभूत झाले आहेत, तर दोन सामन्यांचा निकाल लागला नाही.

2. इंदोर टी-20 सामन्यात कोहलीने नाबाद 30 धावांची खेळी केली. या सामन्यात पहिली धाव करताच तो टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. या सामन्यापूर्वी रोहित शर्मा आणि कोहली संयुक्तपणे अव्वल स्थानी होते. या सामन्यापूर्वी कोहली आणि रोहितने 2633 धावा केल्या होत्या. श्रीलंकेविरुद्ध या मालिकेत रोहितला विश्रांती देण्यात आली आहे.

3. सामन्यात बुमराहने एक गडी बाद केला. यासह त्याने टी-20 मध्ये 52 विकेट्स पूर्ण केल्या. बुमराहने 44 टी-20 सामन्यात हा टप्पा गाठला आणि रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल यांची बरोबरी केली. अश्विनने 46 आणि चहल 36आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये प्रत्येकी 52-52 गडी बाद केले आहे.

4. इंदोरच्या होळकर स्टेडियममध्ये भारताने या मैदानावर श्रीलंकेला पराभूत करण्याचा विक्रम कायम ठेवला आहे. या मैदानावर भारताने 2 कसोटी, 5 वनडे आणि 2 टी -20 सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे त्याने श्रीलंकेविरुद्ध दोन्ही टी-20 सामने खेळले आहेत.

5. लसिथ मलिंगा श्रीलंकेकडून सर्वाधिक टी-20 क्रिकेट खेळणारा पहिला खेळाडू बनला आहे. भारत विरुद्ध इंदोरमधील सामना मलिंगाचा 81 वा सामना होता. यापूर्वी, तिलकरत्ने दिलशान याने 80 टी-20 सामने खेळले आहेत.

6. श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाने 12 टी-20 सामने जिंकले आहेत. कोणत्याही संघाविरुद्ध भारतीय संघाने जिंकलेले हे सर्वाधिक सामने आहेत.

7.आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यामध्ये केएल राहुल याने युवराज सिंह याला मागे टाकले आहे. युवराजने 51 डावांमध्ये 1177 धावा केल्या होत्या. राहुलने 32 डावांमध्ये 1183 धावा केल्या आहेत.

8. घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध 7 व्या सामन्यात भारताचा हा 6 वा विजय आहे. मागील, गुवाहाटीसामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

9. कोहलीने टी-20 क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. महेंद्र सिंह धोनी याच्यानंतर हा पराक्रम करणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरला.

10. कारकिर्दीत पहिल्यांदाच बुमराहच्या टी-20 सामन्याच्या 20 व्या षटकात फलंदाजाने तीन चौकार ठोकले.

इंदोर सामन्यात भारताने टॉस जिंकून श्रीलंकेला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेटवर 142 धावांवर रोखले. टीम इंडियाकडून नवदीप सैनी याने 4 ओव्हरमध्ये 18 धावांवर 2 आणि शादूल ठाकूर याने तितक्याच ओव्हरमध्ये 23 धावांवर 3 गडी बाद केले. भारताने 143 धावांचे लक्ष्य 17.3 ओव्हरमध्ये 3 गडी गमावून पूर्ण केले. भारताकडून विराटऐवजी राहुलने 32 चेंडूत 45 आणि श्रेयस अय्यर याने 26 चेंडूत 34 धावांचे योगदान दिले.