Day/Night Test at Eden Gardens: पहिला डे-नाईट मॅचच नाही, ईडन गार्डन्सवरील 'हे' 5 क्षण क्रिकेट चाहते कधीही विसरणार नाही, जाणून घ्या
(Photo Credit: Twitter/BCCI)

इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानानंतर भारतातील ईडन गार्डन्स (Eden Gardens) हे आधुनिक इतिहासातील निर्विवादपणे महान आणि प्रसिद्ध क्रिकेट स्टेडियम आहे. केवळ प्रेक्षकच नव्हे तर क्रिकेटपटूदेखील एखाद्या दिवशी या मैदानावर खेळायचे स्वप्न पाहतात. आता क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या या मैदानावर पहिला डे-नाईट सामना खेळला जाणार आहे. 66,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांची क्षमता असणारे इडन गार्डन हे भारतातील सर्वात मोठे आणिफक्त मेलबर्न क्रिकेट मैदानानंतर जगातील दुसरे सर्वात मोठे स्टेडियम आहे. भारतीय क्रिकेटमधील सर्वात ऐतिहासिक आणि काही महत्त्वपूर्ण क्षणांचा हा स्टेडियममध्ये साक्षी राहिला आहे. 2001 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) याची 281 धावांची खेळी, तर 2014 मध्ये श्रीलंकाविरूद्ध रोहित शर्मा (Rohit Sharma) याने वनडेमध्ये 173 चेंडूत केलेल्या सर्वाधिक 264 धावा, या मैदानाने हे सर्व पाहिले आहे. आणि आता हेच स्टेडियम भारताच्या (India) पहिल्या डे-नाईट सामन्याचे यजमानपद भूषवणार आहे. (IND vs BAN Day/Night Test: विराट कोहली याच्याकडे विश्वविक्रम नोंदवण्याची संधी, कोणताही भारतीय कर्णधार नाही करू शकला 'ही' कामगिरी)

22 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या या ऐतिहासिक टेस्ट मॅचआधी आपण पाहूया असे काही अविस्मरणीय क्षण जे या स्टेडियमला खास बनवतात.

हरभजन सिंह टेस्ट हॅटट्रिक

मार्च 1998 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हरभजन सिंह (Harbhajan Singh) याच्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका कारकीर्दीतील सर्वात महत्वाची ठरली. 2000-01 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कामगिरी करुन हरभजन कसोटी हॅटट्रिक करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. 11 मार्च 2001 मध्ये ईडन गार्डन्सवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भज्जीने ही कामगिरी बजावली. 2001 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात रिकी पॉन्टिंग, अ‍ॅडम गिलक्रिस्ट आणि शेन वॉर्न यांना बाद करत भज्जीने ईडन गार्डनमध्ये हॅटट्रिक घेतली.

रोहित शर्माने नोंदवल्या सर्वाधिक वैयक्तिक वनडे धावा

टीम इंडियाचा 'हिटमॅन' रोहित सध्या मर्यादित षटकारांच्या क्रिकेटमध्ये सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे.रोहित आणि ईडन गार्डन्सचं नातं खूप जुने आहे. हे मैदान रोहितसाठी खुप खास मानले जाते आणि त्याचे कारणही आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथे झालेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात रोहितने 13 नोव्हेंबर 2014 रोजी श्रीलंकेविरुद्ध 264 धावांची खेळी केली होती, जी आजपर्यंतच्या वनडे इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

व्हीव्हीस लक्ष्मण-राहुल द्रविड यांची रेकॉर्ड भागीदारी

लक्ष्मण आणि राहुलची टेस्टमधील सर्वाधिक भागीदारींपैकी एक कोणताही क्रिकेटप्रेमी विसरू शकणार नाही. 2001 मध्ये सलग 17 टेस्ट सामना जिंकण्याच्या हेतूने आलेल्या ऑस्ट्रेलिया टीमविरुद्ध भारतीय संघ बॅकफूटवर होती. पण, लक्ष्मण आणि द्रविडच्या भागीदारीने ज्याप्रकारे संघाला विजय मिळवून दिला त्याची आठवण आजही सर्वांच्या लक्षात आहे. या मॅचमध्ये लक्ष्मणने 281 धावांची खेळी करत संघाला कठीण परिस्थतीतून बाहेर काढले. ईडन गार्डनमध्ये झालेल्या या मॅचमध्ये लक्ष्मणने 'द वॉल' राहुलसह 376 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाचा विजयी रथ रोखला.

रोहित शर्मा टेस्ट डेब्यू शतक

रोहितसाठी आणि ईडन गार्डनमधील नातं सर्वांना चांगलंच ठाऊक आहे. रोहितने 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेतून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारत आणि वेस्ट इंडिजमधील पहिला कसोटी सामना ईडन गार्डनमध्ये खेळला गेला. विंडीजविरुद्ध हा सामना सचिन तेंडुलकर याचा 199 वा सामना होता. रोहितने या सामन्यातूनच टेस्टमध्ये पदार्पण केले. भारताच्या पहिल्या डावात रोहितने 177 धावांची प्रभावी खेळी केली होती. या सामन्यात टीम इंडियाने डाव आणि 51 धावांनी विजय मिळवला होता.

सौरव गांगुलीचे ईडनवरील पहिले टेस्ट शतक

कसोटी शतक झळकावणे ही कोणत्याही क्रिकेटपटूसाठी खास गोष्ट आहे परंतु आपल्या घराच्या मैदानावर शतक करणे हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. सौरव गांगुली (Sourav Ganguly) हा कोलकाताचा स्थानिक खेळाडू होता आणि तरीही त्याने दशकभर खेळूनही ईडन गार्डन्सवर कधीही शतक झळकावले नव्हते. पण, 2007 मध्ये पाकिस्तानविरुद्ध दुसर्‍या कसोटी सामन्यात हे सर्व बदलले. 1 डिसेंबर रोजी अखेर गांगुलीने तीन अंकी अडथळा पार केला. घराच्या मैदानावर खेळताना गुंगुलीचे हे पहिले शतक होते.

1841 मध्ये तयार केलेल्या या जागेचे नाव भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड ऑकलंडच्या इडन बहिणींच्या नावावरून देण्यात आले. 1871 मध्ये पॅव्हिलिअन बांधला गेला आणि मैदानावर क्रिकेट खेळायला सुरुवात झाली. पहिला कसोटी सामना 1934 मध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यात खेळला गेला होता, तर मैदानावर पहिला वनडे सामना 1987 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाला होता. 1987 मध्ये इंग्लंडच्या लॉर्ड्सनंतर विश्वचषकच्या अंतिम फेरीचे आयोजन करणार्‍रे इडन गार्डन दुसरे स्टेडियम बनले.