Maha Vikas Aghadi: शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल- संजय राऊत
Sharad Pawar And Sanjay Raut (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्रात (Maharashtra) सत्ता स्थापन करून महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) एक वर्ष पूर्ण झाले आहे. महाविकास आघाडीत सरकारमध्ये तीन्ही पक्ष भिन्न विचाराचे असल्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, अशी टीका विरोधक वारंवार करत आहेत. दरम्यान, आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईतल्या सिल्वर ओक या बंगल्यावर जाऊन शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करून शरद पवार यांच्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. तसेच शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, असेही ते म्हणाले आहेत. दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनंतर झालेली ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

“आदरणीय शरद पवार यांना भेटलो. महाराष्ट्रातील राजकीय परिवर्तनात त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांचा कामाचा उरक आणि उत्साह थक्क करणारा आहे. संकट आणि असंख्य वादळांमध्ये त्यांचे नेतृत्त्व खंबीरपणे उभे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. नक्कीच आणि निश्चित” अशा आशयाचे संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. हे देखील वाचा- Anil Parab Criticizes on BJP: 'त्यांना पाच वर्ष दुसरे काम नाही' शिवसेना नेते अनिल परब यांचा विरोधकांना टोला

संजय राऊत यांचे ट्विट-

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अंतर्गत वादातून शिवसेनेने भाजपशी युती तोडली होती. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हात मिळवणी करत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातला प्रयोग हा महाराष्ट्राच्या राजकारणातला एक महत्त्वाचा प्रयोग आहे. त्यावेळी संजय राऊत आणि शरद पवार यांनी घेतलेल्या पुढाकारानंतर हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.