आमच्या कामांना स्थगिती देणं इतकंच सरकारचं काम- रावसाहेब दानवे
रावसाहेब दानवे (फोटो सौजन्य- ट्विटर)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विरोधकांवर सतत आगपाखड करत असून फडणवीस सरकारच्या कामांना स्थगिती देणे इतकेच काम ते करत आहे असे भाजपा नेते रावसाहेब दानवे (RaoSaheb Danve) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुलाखतीसंबंधी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. नवीन सरकार कोणतेही नवीन काम करत नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भविष्याविषयी भाष्य केलं होते. त्यावर उत्तर देताना रावसाहेब दानवे यांनी हे विधान केले.

आगामी काळात महाविकास आघाडीचं आव्हान समोर असेल असं विचारलं असता, महापालिकेत ते एकत्र येऊ शकत नाहीत. एकत्र आले तरी आव्हान नाही आणि वेगळे लढले तरी आव्हान नाही असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्यात NRC लागू करणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान

दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भविष्याविषयी भाष्य केलं आहे. सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज्यातील इतर मुद्यांबरोबरच बुलेट ट्रेनविषयीही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या हिताचे असलेले प्रकल्पच राज्यात आले पाहिजे असे सांगत सरकारच्या पैशाच्या योग्य वापर झाला पाहिजे असे सांगितले होते.

यावर स्पष्टीकरण देत बुलेट ट्रेनसासाठी राज्याचा पैसा वापरत नसून राज्याच्या तिजोरीवर कोणताही ताण येणार नाही असं भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. तसेच हे नवीन सरकार केवळ आमच्या कामाला स्थगिती देणं इतकचं काम सरकार करत आहे. कोणतंही नवं काम ते करत नाही आहेत असा टोला लगावला.