'मुख्यमंत्रीपदच काय इंद्रपद दिले तरीही माघार नाही'- संजय राऊत
Sanjay Raut | Photo Credits: Twitter/ ANI

महाराष्ट्रात (Maharashtra) राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यात कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार, असा प्रश्न महाराष्ट्रातील जनेतेला पडला होता. यावर काँग्रेसकडून (Congress) शिवसेना (ShivSena) पक्षाला पाठिंबा दर्शवल्यानंतर लवकरच महाराष्ट्राला नवे सरकार मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नुकतीच संजय राऊत (Sanjay Raut) यांची मुंबई (Mumbai) येथे पत्रकार परिषद सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीपदच काय इंद्रपद दिले तरीही माघार नाही अशी आक्रमक भुमिका घेऊन संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टिका केली आहे. तसेच सत्तास्थापनेबाबत आज शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या यांच्यात चर्चा होणार असून तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र विधानसभा निवडणुक लढवली होती. मात्र, मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात वाद निर्माण झाला होता. या निवडणुकीत भाजपला अधिक जागा मिळाल्या तरीदेखील राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना शिवसेना पक्षाची गरज भासत होती. परंतु, दोन्हीही पक्ष एकमतावर ठाम असल्यामुळे युतीत दूरी निर्माण झाली. यानंतर शिवसेना पक्षाने काँग्रेस-राष्ट्रवादीला याच्यासोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. परंतु, शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नकार दर्शवला होता. त्यावेळी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आमदारांनी पक्षावर दबाव टाकायला सुरुवात केली होती. यानंतर गुरुवारी सोनिया गांधी सहमती दर्शवली असून लवकरच महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावर संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आमचे ठरले असून आता भाजपने मुख्यमंत्रीपदच काय इंद्रपद दिले तरीही आम्ही माघार घेणार नाही, असे संजय राऊत त्यावेळी म्हणाले आहेत. हे देखील वाचा- राज ठाकरे यांचे भाकीत खरे ठरले; 'निवडणुकीनंतर शिवसेना राष्ट्रवादी सोबत जाणार तर, भाजप विरोधी पक्षात बसणार'

एएनआयचे ट्वीट-

दरम्यान, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचाच उमेदवार विराजमान होणार असून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांची याला सहमती आहे. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विराजमान व्हावे असे, महाराष्ट्रातील जनेतेची हाक आहे. महत्वाचे म्हणजे येत्या दोन दिवसात यावर निर्णय घेऊ असेही संजय राऊत म्हणाले आहेत. काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे, अहमद पटेल, राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थिती मोठा निर्णय घेण्यात येणार आहे.