MP Navneet Ravi Rana: नवनीत राणा यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी धमकी दिल्याचा आरोप
नवनीत राणा व अरविंद सावंत (संग्रहित संपादित प्रतिमा)

अमरावती (Amravati ) येथील खासदार नवनीत राणा ( Navneet Ravi Rana) यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात त्यांंनी शिवसेना (Shiv Sena) खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant ) यांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप केला आहे. नवनीत राणा यांनी पत्रात म्हटले आहे की, लोकसभेच्या लॉबीमध्ये खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकी दिली की, ''तू महाराष्ट्रात कशी फिरतेस तेच पाहतो. तुलाही तुरुंगात टाकू'' असे खा. सावंत यांनी म्हटल्याचा उल्लेख राणा यांनी आपल्या पत्रात केला आहे.

सचिन वाझे प्रकरणाचे पडसाद आज (22 मार्च) लोकसभा सभागृहातही पाहायला मिळाले. सचिन वाझे प्रकरणारुन आक्रमक झालेल्या भाजप खासदारांनी महाराष्ट्रात राष्टपती राजवट लावण्यात यावी अशी मागणी केली. खादसाद नवनीत राणा यांनीही राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली.

नवनीत राणा यांनी पत्रात काय म्हटले?

वरील विषयास अनुसरुन, महाराष्ट्रात सुरु असलेल्या मनसुख हिरेन मृत्यू आणि सचिन वाझे प्रकरणाबाबत तसेच माजी पोलीस आयुक्त मुंबई यांच्या पत्रावरुन ठाकरे सरकारवर अनेक प्रश्न विचारले जात आहेत. लोकशाहीला अनुसरुन महाराष्ट्रात बिघडत असलेल्या कायदा व सुव्यवस्तेबाबत एक महिला खासदार म्हणून मी ठाकरे सरकारविरोधात प्रश्न विचारले. यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मला लोकसभा लॉबीमध्ये ''तू महाराष्ट्रात कशी फिरतेस तेच पाहतो. तुलाही तुरुंगात टाकू'' असे म्हणत धमकी दिली. (हेही वाचा, परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बचा लोकसभेत धमाका; आक्रमक भुमिका घेत नवनीत राणा, गिरीश बापट यांनी केली 'अशी' मागणी)

नवनीत राणा यांनी याच पत्रात पुढे म्हटले आहे की, शिवसेनेच्या लेटर हेडवर, फोनवर आणि माझ्या चेहऱ्यावर अॅसीड फेकण्याच्या तसेच जीवे मारण्याच्या धमक्याही मला अनेकदा मिळाल्या आहेत. आज अरविंद सावंत यांच्याकडून मला मिळालेली धमकी ही केवळ माझाच नव्हे तर देशातील सर्व महिलांचा अपमान आहे. त्यामुळे अरविंद सावंत यांच्यावर कठोरातील कठोर पोलीस करावई करण्यात यावी, अशी मागणीही खसदार नवनीत राणा यांनी केली आहे.

दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पाठवलेल्या पत्राच्या प्रती पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री व दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना पाठवली आहे. त्याबाबतचा उल्लेख राणा यांनी आपल्या पत्रात केला आहे.