परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बचा लोकसभेत धमाका; आक्रमक भुमिका घेत नवनीत राणा, गिरीश बापट यांनी केली 'अशी' मागणी

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्या पत्रामुळे राज्यात खळबळ माजली आहे. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याचपार्श्वभूमीवर परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बचा आज लोकसभेतही धमाका झाला आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी लोकसभेत गदारोळ केला आहे. याप्रकरणी लोकसभेत भाजपचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat), पूनम महाजन आणि अपक्ष खासदार नवनीत राणा (Navaneet Rana) यांनी महाराष्ट्र सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. तर, भाजपच्या टिकेला महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) नेत्यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.

लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर शून्य प्रहारात भाजपने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रावरून जोरदार आवाज उठवला. परमबीर सिंह यांनी केलेले आरोप गंभीर असून महाराष्ट्रात सुव्यवस्था राहिली नाही. यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. हे देखील वाचा- Maharashtra Home Minister Anil Deshmukh यांची CBI चौकशी करण्याच्या मागणीसाठी Param Bir Singh यांची Supreme Court मध्ये धाव

गरीश बापट काय म्हणाले?

महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. सत्ताधाऱ्यांकडून पोलीस अधिकाऱ्यांना खंडणी वसुलीचे टार्गेट दिले जात आहे. पोलीसच खंडणी मागत असून त्यांना मंत्र्यांचा आशार्वाद आहे. अशावेळी जनतेने कुणाकडे पाह्यचे? असे सांगतानाच हे प्रकरण अत्यंत गंभीर असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी गिरीश बापट यांनी लोकसभेत केली आहे.

नवनीत राणा यांची मागणी काय?

"जो व्यक्ती 16 वर्ष निलंबित होता, 7 दिवस जेलमध्ये राहिला त्याला कोणत्या आधारे पुन्हा सेवेत घेतल? राज्यात भाजपचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझेंना पुन्हा घेण्यास सांगितले होते. परंतु, त्यावेळी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट नकार दिला. मात्र, राज्यात ठाकरे सरकारनंतर त्यांनी परमबीर सिंह यांना फोन करुन सर्वात आधी सचिन वाझेंना सेवेत घेतले. सचिन वाझेंमुळे परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली आहे", यासंदर्भात चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर देत आरोप फेटाळून लावले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यापासूनच राज्य सरकार पाडण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी सुरू असून या चौकशीतून सत्यबाहेर येईल, असे विनायक राऊत म्हणाले आहेत.