
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांवरुन घेतलेल्या भूमिकेला भाजपने पाठिंबा दिला आहे. अनेक भाजप (BJP) नेत्यांनी त्यांचे तोंडभरुन कौतुकही केले आहे. दरम्यान, पुणे भाजप उपाध्यक्ष संजय काकडे (Sanjay Kakade) यांनी मात्र राज ठाकरे यांच्या यांना वेगळाच सल्ला दिला आहे. राज ठाकरे यांनी धर्म, जात पात यांपेक्षा थेट विकासाच्या मुद्यांवर बोलावे, असे म्हटले आहे. शिवाय मनसेशी युती करुन भाजपला विशेष असा काहीच फायदा मिळणार नाही, असेही काकडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे संजय काकडे यांच्या वक्तव्यावर राज ठाकरे काय बोलणार याबाबत राजकीय वर्तुळातून उत्सुकता आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज (17 एप्रिल) पुण्यात आहेत. कालही त्यांनी पुणे येथे हनुमान चालीसा पटण केले. आज ते पत्रकार परिषद घेणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे संजय काकडे यांच्या विधानावर राज ठाकरे बोलणार का? याबाबत उत्सुकता आहे. संजय काकडे यांनी स्पष्ट भूमिका मांडत म्हटले आहे की, राज ठाकरे यांनी जात, धर्मापेक्षा विकासावर बोलावे. भोंगे लावले किंवा काढले आणि हनुमान चालीसा वाचल्या तरी त्यातून नोकऱ्या मिळणार आहेत का? महाआरत्या, हनुमानचालीसा वाचण्यासाठी लोक मोठ्या संख्येने एकत्र येतात. त्यातून सामूदाईक वेळ जातो. लोक एकत्र येतात, पोलिसांचा, नागरिकांचा बदोबस्त वाढवावा लागतो. त्यातून खूप वेळ वाया जातो, असेही काकडे म्हणाले. (हेही वाचा, Dilip Walse Patil On Loudspeaker: मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याप्रकरणी कायदा व सुव्यवस्था हातात घेतल्यास कारवाई केली जाईल, गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलांचा इशारा)
राज ठाकरे यांनी राज्य सरकारलाच इशारा देत मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी इशारा दिला आहे. येत्या तीन मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरविण्या यावेत अन्यथा मनसे हे भोंगे उतरवेल. तसेच, ज्या ज्या वेळी आजान होईल त्या वेळी इकडे हनुमान चालिसा पटण केले जाईल, असेही राज ठाकरे यांनी म्हटले होते. यावर राज्याच्या राजकारणामध्ये तीव्र पडसाद उमटले. खास करुन मनसेतही जोरदार पडसाद उमठले. अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे राज ठाकरे आता काय बोलतात याबाबत उत्सुकता आहे.