मुंबई, पुणे शहरांसह उर्वरीत महाराष्ट्र परतीच्या पावसाने चिंब
Rain Image used for representational purpose only | (Photo Credits: Pixabay)

Rain in Maharashtra 2019: राजधानी मुंबई शहरासह पुणे (Pune City) आणि राज्यातील उर्वतीत भागात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. परतीच्या पावसाने शुक्रवार दुपार आणि सायंकाळपासूनच हजेरी लावली. शनिवार सकाळपासूनही मुंबई आणि पुण्यातील काही भागात पावसाने सुरुवात केली. मुंबईतील ठाणे, नवी मुंबई (New Mumbai) परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या अचानक आलेल्या पावसाने कामासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची चांगलीच धावपळ उडाली. दरम्यान, हवामान खात्यानेही पुढचे दोन दिवस महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपात परतीचा पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

दरम्यान, हवामान खात्याने या आधी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, दोन दिवसांपासून देशातून पऊस परतला आहे. परतीच्या पावसाचे मार्गक्रमण सुरु असतानाच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला. त्यामुळे पुढचे दोन दिवस राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडले असे हवामान खात्याने म्हटले आहे. तसेच, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये हवामना ढगाळ राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पुणे परिसरात सिंहगड रस्ता, कात्रज, हडपसर व इतरही काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळला आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी हवामान ढगाळ आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या धारा कोसळत आहे. राज्यभरात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याचे चित्र आहे. मात्र, तरीही राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पुरेशा प्रमाणात न पडल्याने पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश्य स्थिती आहे. अशा ठिकाणी परतीच्या पावसाने दिलासा मिळाला आहे. (हेही वाचा, देशात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या नव्या ठिकाणाची नोंद; महाबळेश्वर, ताम्हिणी येथे चेरापुंजीपेक्षाही अधिक पर्जनवृष्टीची नोंद)

यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकरी आनंदात आहेत. यंदाच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी तर जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध होणार आहे. गेली अनेक वर्षे ज्या भागातील नद्या, नाल्यांना, ओढ्यांना पाणी आले नव्हते अशाही ठिकाणी यंदा पाऊस चांगलाच बरसला आहे. त्यामुळे याही ठिकाणी नद्या, नाले, तलाव असंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर यंदा काहीसे आनंदाचे भाव पाहायला मिळत आहेत.