रायगड: सोन्याची वाडी येथे पुरात अडकलेल्या 75 पैकी 23 नागरिक आपत्ती व्यवस्थापन विभागासह पोलिसांच्या सहाय्याने सुखरुप बाहेर
Rain (Photo Credits: ANI)

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने ठिकठिकाणी पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच नद्यांच्या पातळीत वाढ होऊन काही ठिकाणी पुराची परिस्थिती उद्भवली आहे. याच दरम्यान आता रायगड मधील सोन्याची वाडी गावात पुरात अकडलेल्या 75 पैकी 23 नागरिकांना सुखरुप बाहेर कढण्यात आले आहे. ही कामगिरी आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलिसांच्या सहाय्याने पार पडली आहे. तसेच अद्याप उर्वरित नागरिकांना पुरातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती रायगड पोलीस पीआरओ यांनी दिली आहे.

पुरात अडकलेल्या नागरिकांना बोटीच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून त्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्याचसोबत मुंबई- गोवा माणगाव येथील कळमजे ब्रीजच्या कमानीच्या वरती पाणी आल्याने तो बंद करण्यात आल्याची माहिती सुद्धा रायगड पोलिसांनी दिली आहे.(Mumbai Goa Highway Traffic Updates: कोकणातील मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प; वाहतूककोंडीमुळे चाकरमान्यांचे हाल)

Tweet:

दरम्यान, गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह सौराष्ट्र येथे आज अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच कच्छ येथे 5 आणि 6 ऑगस्टला ही अतिवृष्टीची शक्यता IMD यांनी व्यक्त केली आहे. त्याचसोबत मुंबईत आणि मध्य महाराष्ट्रालगत घाट परिसरात ही उद्यापर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. परंतु त्यानंतर पावसाचा जोर कमी होऊ शकतो असे ही आयएमडी यांनी म्हटले आहे.