यंदाच्या पोलीस भरतीमध्ये नवे नियम; आता मैदानी चाचणी फक्त 50 गुणांची
पोलीस भरतीसाठी आता शारीरिक चाचणी (मैदानी चाचणी) आधी लेखी परीक्षा होणार आहे. त्यामुळे जर का लेखी परीक्षा पास झालात तरच तुम्हाला मैदानी चाचणी देता येणार आहे
Police Recruitment New Rules : राज्यात पोलीस भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे, TV9 ने दिलेल्या वृत्तानुसार पोलीस भरतीसाठी आता शारीरिक चाचणी (मैदानी चाचणी) आधी लेखी परीक्षा होणार आहे. त्यामुळे जर का लेखी परीक्षा पास झालात तरच तुम्हाला मैदानी चाचणी देता येणार आहे. यावर्षी पोलीस भरतीच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. याद्वारे आता मैदानी चाचणी ही 100 ऐवजी 50 गुणांची होणार आहे. लवकरच या नियमाचा जीआर काढला जाणार आहे.
यंदाच्या पोलीस भरतीसाठी फक्त मैदानी चाचणीमध्ये बदल करण्यात आले आहेत, तर लेखी परीक्षेचे नियम आहे तसेच राहतील. अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी हे लेखी परीक्षेचे विषय आहेत. लेखी परीक्षेत खुल्या गटाला किमान 35 टक्के, राखीव गटासाठी 33 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही मैदानी चाचणी देऊ शकणार आहात. (हेही वाचा : राज्य कर निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक या पदांसाठी राज्यात 555 उमेदवारांची होणार भरती, पहा कुठे, कसा आणि कधी पर्यंत करू शकाल अर्ज?)
मैदानी चाचणीसाठी असलेल्या प्रकारांमध्येही आता बदल करण्यात आला आहे. नव्या नियमांनुसार आता पुरुषांसाठी लांबउडी, पुलअप्स वगळून केवळ तीन आणि महिलांसाठीही लांब उडी वगळून तीनच प्रकार ठेवण्यात आले आहेत.
पुरुषांसाठी – एकूण गुण 50
1600 मीटर धावणे – 30 गुण
100 मीटर धावणे – 10 गुण
गोळाफेक – 10 गुण
महिलांसाठी – एकूण गुण 50
800 मीटर धावणे – 30 गुण
100 मीटर धावणे – 10 गुण
गोळाफेक – 10 गुण
दरम्यान ऐन परीक्षेच्या तोंडावर शासनाने हे बदल केले असल्याने मुलांचे यामुळे नुकसान होऊ शकते अशी टीका केली जात आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 21, 2019 08:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

