Ayodhya Ram Mandir: 'राम मंदिर बांधून कोरोना जाणार नाही' राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला
Sharad Pawar And Narendra Modi (Photo Credit: PTI)

उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये राममंदिराच्या (Ram Mandir Temple) कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्टला पार पडणार आहे. दरम्यान, दुसरीकडे देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले आहे. कोरोनामुळे नागरिकांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. कोरोना संकटात सापडलेल्या लोकांना कसे बाहेर काढायचे? याबाबत आम्ही विचार करत आहोत, त्याला आम्ही प्राधान्य देत आहेत. काही लोकांना वाटत असेल मंदिर बांधून कोरोना जाईल. त्यामुळे राममंदिर बांधण्याचा त्यांनी निर्णय घेतला असावा, असे बोलत शरद पवार यांनी नरेंद्र यांना टोला लगावला आहे.

कोरोना विषाणू फैलावाच्या परिस्थिती व सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पवार रविवारी सोलापुरात आले होते. आढावा बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी कोरोना संकटाच्या मुद्यावर मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, ते म्हणाले की, "कोरोना हे देशावरचे मोठे संकट आहे. त्यावर यशस्वीपणे मात करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार एकत्रित आले पाहिजे. एकमेकांशी योग्य समन्वय साधून काम झाले पाहिजे. करोनाचे भयसंकट परतवून लावण्यासाठी कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे, हे प्राधान्याने ठरविले पाहिजे. परंतू, मंदिर बांधून कोरोनाचे संकट दूर होईल, असे काही मंडळींना वाटते आहे. राम मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येत असेल तर, भूमिपूजन अवश्य करा. फक्त कोरोनाचे संकट दूर व्हावे, हीच आमची इच्छा आहे", असे शरद पवार म्हणाले आहेत. हे देखील वाचा- सरकार पडण्याच्या भितीने महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना झोप येत नसेल- चंद्रकांत पाटील

एएनआयचे ट्वीट- 

 

देशातील धोकादायक शहरामध्ये सोलापूरचा समावेश होतो. राज्यातील मृत्यूदरापेक्षा सोलापूरचा मृत्यूदर जास्त असून तो काळजी करण्यासारखा असल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले आहे. बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील परिस्थिती गंभीर आहे.तसेच सोलापूर जिल्हा हा आपत्तीवर मात करणारा जिल्हा आहे. स्वातंत्र्यापूर्वी सोलापूर शहराने ब्रिटीशांना काही काळाच हकलून लावलं होतं. ब्रिटिशांवर मात केली त्यामुळे कोव्हिडवर नक्की मात करेल, असा विश्वास देखील शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.