पावसाचा मुक्काम! येत्या 48 तासात मुंबई शहरासह उर्वरीत महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पुन्हा बरसण्याची शक्यता
Cloudy Weather | Image used for representational purpose only | (Photo Credits: Pixabay)

Rain in Maharashtra: राज्यातील अनेक ठिकाणी यंदा दमदार बरसलेला पाऊस परतीच्या वाटेवरही मुक्काम ठोकण्यच्या विचारात दिसतो आहे. गेले दोन दिवस महाराष्ट्रात तुरळक प्रमाणात हजेरी लावलेला पाऊस पुढचे 48 तास कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या 48 तासात मुंबई (Mumbai), मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात तुरळक प्रमाणात तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मान्सून परत गेला असल्याचे हवामान विभागाने या आधीच जाहीर केले होते. वास्तवात पाऊस मात्र अद्यापही बरसण्याचच्या मनस्थितीत आहे. त्यामुळे लहरी पावसाचा अंदाज हवामान विभागालाही घेता येईना की काय अशी चर्चा नागरिक करु लागले आहेत.

दरम्यान, हवामान विभगाने म्हटले आहे की, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. असे असले तरी, त्याचे चक्रिवादळात रुपांतर होण्याची मुळीच शक्यता नाही. तसेच, कमी दाबाचे तयार झालेले क्षेत्र हे किनारपट्टीपासून बरेच लांब आहे. त्यामुळे त्याचा नागरी वस्त्यांना फारसा धोका संभावत नाही. तरीही नागरिकांनी दक्षता घ्यायला हवी, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, येत्या सोमवारपर्यंत मध्य महाराष्ट्र म्हणजेच कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आदी परिसरात तर पुणे, मराठवाडा आणि राज्यातील उर्वरीत काही भगात वीजा, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. (हेही वाचा, मुंबई, पुणे शहरांसह उर्वरीत महाराष्ट्र परतीच्या पावसाने चिंब)

ट्विट

दरम्यान, बंगालच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने आकाशात ढग दिसत असले तरी, या घडामोडींमुळे मुंबई शहरात मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही. त्यामुळे मुंबईकरांनी पावसाला घाबरण्याचे कारण नाही. मुंबईत पाऊस आलाच तरी तो हलक्या ते मध्यम स्वरुपाचा असेल. ढगाळ वातावरण कायम राहील. प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ही माहिती दिली.