Mumbai: कोविड-19 मृत्यूच्या भरपाईसाठी मंजूर झाले 24,638 अर्ज; आतापर्यंत फक्त 2,216 कुटुंबांनाच मिळाली मदत
Coronavirus cases | (Photo Credits: PTI)

बीएमसीने (BMC) ने कोविड-19 मुळे मरण पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून भरपाईसाठी 24,638 अर्ज मंजूर केले आहेत, परंतु आतापर्यंत 10 टक्क्यांपेक्षा कमी म्हणजेच 2,216 लोकांनाच 50,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. राज्य सरकारने कोविड-19 व्हायरसने बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 50,000 रुपयांची मदत जाहीर केल्यानंतर, बीएमसी हे अर्ज भरून घेतले होते. 13 एप्रिलपर्यंत, 38,887 अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी 24,638 मंजूर झाले, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, जे बीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रभारी देखील आहेत.

यातील 16,767 अर्ज मुंबईचे होते, तर 7,871 अर्ज शहराबाहेरचे होते. यातील एकूण 13,602 अर्ज फेटाळण्यात आले. यापैकी 5,431 अर्जदारांनी तक्रार निवारण समितीकडे (GRC) अपील करून बीएमसीने त्यांचे अर्ज नाकारल्याचा आढावा घ्यावा अशी मागणी केली होती. याआधी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची बीएमसी अधिकाऱ्यांसमवेत, फेब्रुवारी 2022 मध्ये वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान येथे जीआरसीची बैठक झाली. संबंधित कागदपत्रांच्या पडताळणीनंतर समिती तिच्यासमोर दाखल करण्यात आलेले एक्स-ग्रेशियाचे दावे मंजूर करते किंवा नाकारते. (हेही वाचा: Nashik MHADA Lottery: नाशिककरांना मिळणार 2031 म्हाडा घरे; मे, जून महिन्यात निघणार सोडत)

समितीसमोर अर्जांची प्रकरणे मांडणाऱ्या 373 अर्जदारांना भरपाई मंजूर करण्यात आली. त्यानंतर 13 एप्रिलपर्यंत केवळ 2,216 लोकांना नुकसान भरपाई देण्यात आली. 2,216 पेमेंटपैकी 2,109 मुंबईतील आहेत. बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अर्जदारांनी नागरी संस्थेकडे अर्ज केल्यामुळे ते बीएमसीकडे तक्रार करतात, परंतु ही रक्कम राज्य सरकारकडून वितरित केली जाते.

दुसरीकडे राज्य आपत्ती व्यवस्थापनाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी दावा केला की त्यांनी मंजूर अर्जदारांना 90 टक्के देयके वितरित केली आहेत. काही प्रकरणांमध्ये जेथे बँक खाते क्रमांक चुकीचे होते, आम्ही अर्जदारांचे आधार क्रमांक लिंक करून पेमेंट केले गेले, असेही ते म्हणाले. राज्य सरकारच्या मदत आणि पुनर्वसन विभागातील सूत्रांनी सांगितले की, अर्जदार बँक तपशील अचूकपणे भरत नाहीत त्यामुळे ही प्रक्रिया लांबली आहे.