MNS Deepotsav 2022: मनसे दीपोत्सव कार्यक्रमात CM एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे शिवाजी पार्क येथे एकत्र; राजकीय वर्तुळात नव्या युतीची चर्चा
Eknath Shinde, Raj Thackeray, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) आयोजीत दीपोत्सव (MNS Deepotsav) कार्यक्रमास आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) उपस्थित होते. मुंबई येथील शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर पार पडलेल्या या कार्यक्रमासठी हे तिनही दिग्गज एकत्र आल्याचे नागरिकांनी पाहिले. तिन दिग्गजांचे एकत्र येणे हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे दीपोत्सव कार्यक्रम हे निमित्त असले तरी आगामी काळात महाराष्ट्रात नव्या राजकीय युतीची तर ही नांदी नाही ना? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. मनसे, भाजप आणि शिंदे गट यांच्यातील जवळीक वाढता आगामी मुंबई महापालिका आणि राज्यातील इतरही निवडणुकांमध्ये नवे राजकीय समिकरण दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मनसे दीपोत्सव कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले, ''सर्वांना आज दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचा मी अत्यंत आभारी आहे. आज त्यांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली. या उपक्रमाचे यंदा दहावे वर्ष आहे. पाठिमागील दहा वर्षे हा कार्यक्रम आपण आयोजित करतो. यंदा हाकाहीसा अधिक प्रमाणात साजरा होतो आहे. काही लोक मला विचारतात नातू झाल्यामुळे काय? पण नातू होण्याचा आणि दीपोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा काही संबंध नाही. आपण दरवर्षी हा कार्यक्रम वाढवत जाऊ'', अशी मिष्कील टीपण्णीही राज ठाकरे यांनी या वेळी केली. (हेही वाचा, Happy Diwali 2022 HD Images: दिवाळी निमित्त शुभेच्छा देण्यासाठी HD Images, Wallpapers, Greetings, साजरा करा दिव्यांचा उत्सव)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी बोलताना म्हटले की, ''मनसेच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा दीपोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो आहे. याबाबत आनंद आहे. या उपक्रमाला आणि राज्यातील सर्व जनतेला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. यंदाची दिवाळी आपल्या आयुष्यात लक्ष लक्ष दिव्यांप्रमाणे प्रकाश घेऊन यावे. लक्ष लक्ष दिव्यांप्रमाणे आपले जीवन उजळावे या सदिच्छा''.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ''सर्वांना दिवाळीच्या मनापासून सुभेच्छा. राज ठकरे यांच्या नेतृत्वात पाठिमागील 10 वर्षात हा दीपोत्सव साजरा होतो आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार. गेली अनेक वर्षे हा उत्सव आपण साजरा करतो आहोत. परंतू, पाठिमागील दोन वर्षे हा उत्सव कोविडमुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर साजरा करता आला नाही. यंदा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. त्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे. त्यामुळे यंदाचा हा कार्यक्रम काहीसा मोठ्या उत्साहात पार पडतो आहे. आम्ही सत्तेत आलो तेव्हाच आम्ही जनतेला शब्द दिला होता. त्यामुळे यंदा आम्ही शब्द पाळला. सर्व सण-उत्सवांवरील निर्बंध हटवले आहेत. पाठिमागील अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम इकडे साजरा होतो आहे. पण, आमची इच्छा असूनही आम्हाला इकडे येता येत नव्हते. काही गोष्टींसाठी नक्कीच योगायोग यावा लागतो'', असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला टोला लगावला.