Maharashtra School Reopening: कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शाळेत Health Clinic उभारणार
School | Representational Image (Photo Credits: Wikimedia Commons)

कोविड-19 संकटाच्या (Covid 19 Pandemic) पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा (Schools) कधी सुरु होणार, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. रुग्णसंख्येत पुन्हा होणारी वाढ, तिसऱ्या लाटेचा धोका या पार्श्वभूमीवर शाळा दिवाळीनंतर सुरू करायच्या की आत्ताच सुरू करायच्या याबाबत टास्क फोर्सची सल्ला मसलत करण्यात येत आहे. त्यानंतर काही दिवसांत निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, शाळा नेमक्या कधी सुरु होणार याची प्रतिक्षा विद्यार्थ्यांसह पालक करत आहेत. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

एबीपी माझाने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक शाळांमध्ये हेल्थ क्लिनक तयार करण्यात येणार असून यासाठी सीएसआर निधीचा वापर करण्यात येणार आहे. यासंदर्भातील सुधारीत नियमावली शिक्षण विभागाकडून तयार करण्यात येत आहे. यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला ताप, सर्दी, खोकला झाल्यास त्या क्लिनिकची तात्काळ मदत घेतली जाईल. यासाठी लागणारं मनुष्यबळ उभं करण्यासाठी सरकार सध्या प्रयत्नशील आहे. (शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण 5 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश- आरोग्यमंत्री राजेश टोपे)

तसंच शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून पुस्तक हाताळणी होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर मैदान, वर्ग यांचं निर्जुंकीकरण वारंवार करण्याच्या सूचनाही शाळांना देण्यात येणार आहेत. (देशातील लहान मुलांच्या लसीकरणासाठी किती वेळ लागणार? AIIMS Director रणदीप गुलेरिया यांनी दिले 'हे' उत्तर)

दरम्यान, कोरोना संकटामुळे राज्यात मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. आता केवळ कोरोनाचे रुग्ण नसलेल्या ग्रामीण भागात शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र राज्यभरातील शाळा सुरु करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. यासाठीच नवी नियमावली लागू करण्यात आली आहे.