Maharashtra Political Crisis: सुरतेहून सुटका, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसेना आमदार कैलास पाटील यांचा धक्कादायक अनुभव, त्यांच्याच शब्दात जसाच्या तसा
Kailas Patil | (File Image)

शिवसेना आमदार कैलास पाटील (Shiv Sena MLA Kailas Patil) आणि नितीन देशमुख यांची एक संयुक्त पत्रकार परिषद आज (23 जून) मुंबई येथे पार पडली. कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांनी त्यांच्यासोबत नेमके काय घडले याचे शब्दश: वर्णन या वेळी केले. या वेळी शिवसेना नेते संजय राऊत, निलम गोऱ्हे, खासदार अरविंद सावंत, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. कैलास पाटील आणि नितीन देशमुख हे तेच खासदार आहेत, जे एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. नितीन देशमुख हे गुवाहाटीवरुन परत आले तर कैलास पाटील (Shocking Experience of Shiv Sena MLA Kailas Patil) हे सूरतहून परत आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी घेऊन जाताना त्यांच्यासोबत काय घडले याबाबत या दोन्ही आमदारांनी आपले मनोगत व्यक्त केले.

आमदार कैलास पाटील यांच्या शब्दात सुरत कथा जशीच्या तशी

त्या दिवशी विधानपरिषदेचे मतदान झाले. मला एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर बोलावले गेले. अनेकांना बोलावण्यात आले होते. ते नेते असल्याने आम्ही नेहमीच भेटत असतो. आम्हाला सांगण्यात आले. आपल्याला एका ठिकाणी जायचे आहे. आम्हाला ठाण्याच्या महापौर बंगल्यावर नेण्यात आले. तेथून आम्हाला एका गाडीने सोबत नेले. स्टापचा एकजण सोबत होता. पुढे गाडी बदलली. आम्हाला कळत नव्हते. कुठे चाललो आहे. ठाणे गेले, पुढे गेले. शहरं बदलंत गेली. वेगवेगळी चेकपोस्ट लागली. माझ्या मनात पाल चुकचुकली. पुढे बॉर्डर क्रॉस झाली. पुढे गेल्यावर एका ठिकाणी गाडी थांबली. पुढे नाकाबंदी आहे. थोडा वेळ चालत पुढे याल का? ती संधी साधून मी गाडीतून बाहेर पडलो. बराच काळ चालत बाहेर आलो. मी मुंबईच्या दिशेने चालत होतो. ट्रॅफीक खूप होते. पण मी विचार केला. मला शोधायला हे लोक आले तर याच दिशेने येतील. म्हणून मी परत उलटा सुरतच्या दिशेने निघालो.

मोबाईलची बॅटरी संपत आली होती. मी चालतच होतो. लिफ्ट मागण्यासाठी गाड्यांना हात करत होतो. एका मोटारसायकल चालकाने मला लिफ्ट दिली. तो म्हणाला. मी जाईल तिथेपर्यंत सोडेन. नंतर मी पुन्हा चालत निघालो. एकाने ट्रक ड्रायव्हरने मला लिफ्ट दिली. तो यूपीचा होता. त्याने मला एका ठिकाणी सोडले. मी कोनाला लोकेशनही पाठवत नव्हतो. मोबाईलची बॅटरीही संपत आली होती. केवळ सात आठ टक्के राहिली होती. वरुन पाऊस कोसळत होता. मी कसाबसा बाहेर पडलो. आणि महाराष्ट्रात पोहोचलो.