टोळधाड रोखण्यासाठी फटाके फोडा, ढोल वाजवा; गृहमंत्री अनिल देशमुख यांचा शेतकऱ्यांना सल्ला
काटोल मतदारसंघात अनिल देशमुख यांनी टोळीधाडीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टोळधाडीपासून संरक्षण म्हणून फटाके फोडा, ढोल वाजवा असा सल्ला दिला आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) सह भारतावर टोळधाडीचे (Locust Attack) संकटही ओढावले आहे. उत्तर भारतात पिकांचे नुकसान केल्यानंतर टोळीच्या झुंडी महाराष्ट्रात दाखल झाल्या. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला होता. दरम्यान आपल्या काटोल मतदारसंघात (Katol Constituency) अनिल देशमुख यांनी टोळीधाडीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी टोळधाडीपासून संरक्षण म्हणून फटाके फोडा, ढोल वाजवा असा सल्ला दिला आहे.
"टोळधाडी बाबत शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. फटाके फोडून, ढोल वाजवून टोळधाड टाळता येऊ शकते. तसंच जळलेल्या टायरच्या धुराने देखील टोळीच्या धुंडी परतवून लावता येतात," असे अनिल देशमुख यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले. (Locust Attack: टोळधाड म्हणजे काय? शेती आणि शेतकऱ्याला किती नुकसानकारक?)
यापूर्वी महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी 50% टोळ झुंडी राज्याच्या कृषी विभागाने नष्ट केल्याची माहिती दिली होती. किडकनाशकं फवारण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्यांचा वापर करण्यात आला असून शेतकऱ्यांना किडकनाशकं मोफत दिल्याचेही भुसे यांनी सांगितले होते. (महाराष्ट्र राज्यात 50% टोळधाडीचा नाश - कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती)
टोळझुंडी या पाकिस्तानातून राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश राज्यात दाखल झाल्या. त्या ठिकाणी टोळीधाडीने पिकांचे मोठे नुकसान केले. त्यानंतर महाराष्ट्रातील पिकांवर टोळीच्या झुंडीने आक्रमण केले. दरम्यान सतर्क राहून टोळीधाडीमुळे होणारे नुकसान कमी करण्यास महाराष्ट्राच्या कृषी विभागाला यश आले आहे.
टोळ हा एक उपद्रवी कीटक आहे. टोळ आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व पिकांचे नुकसान करतो. हे नुकसान मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे अन्नधान्य पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.
(The above story first appeared on LatestLY on May 31, 2020 11:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

