आदित्य ठाकरे यांच्या वरळी मधील रॅलीत चोरट्यांचा सुळसुळाट; मोबाईल, पैसै आणि सोनसाखळ्यांवर डल्ला
आदित्य ठाकरे (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी आज (3 ऑक्टोंबर) शिवसेना (Shiv Sena)  युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे( Aaditya Thackeray) यांनी वरळी (Worli) मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांची भव्य रॅली लोअर परेल ते वरळी पर्यंत काढण्यात आली होती. मात्र या रॅली दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या समर्थकांनी तर उपस्थिती लावलीच पण चोरट्यांनी मात्र त्यांचे हात चांगलेच साफ केले आहेत.

शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात आदित्य ठाकरे यांच्या रॅलीसाठी उपस्थिती लावली. मात्र रॅलीवेळी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन लुटमार केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये एकूण 13 सोन्याच्या साखळ्या, 4 स्मार्टफोन आणि वरळी शाखा प्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या खिशामधून 40 हजार रुपयांची रोकडवर डल्ला मारण्यात आला आहे. या प्रकरणी वरळी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तर सदर चोरट्यांना अटक करण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज आणि अन्य गोष्टी वापरुन पुढील तपास केला जाणार आहे.(कोणतंही टेन्शन नाही पण, उत्सुकता आहे, मुख्यमंत्री फडणवीस यांनीही फोनवरुन दिल्या शुभेच्छा: आदित्य ठाकरे)

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी असलेल्या ठाकरे कुटुंबियातील आजवर एकाही व्यक्तीने निवडणूक लढवली नव्हीत. निवडणूक न लढवता सत्तेचा रिमोट आपल्या हाती ठेवायचा ही बहुदा ठाकरे घराण्याची परंपराच झाली होती. मात्र, आदित्य ठाकरे यांनी ही परंपरा मोडीत काढत प्रत्यक्ष निवडणुकीस समोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आदित्य ठाकरे हे निवडणूक लढविणारे पहिलेच ठाकरे (शिवसेना) ठरले आहेत. आदित्य ठाकरे यांची उमेदवारी वरळी विधानसभा मतदारसंघातून जाहीर होताच शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच आदित्य यांचा विजय निश्चित असल्याचा दावा शिवसैनिक करत आहे.