महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९: वेंगुर्ले तालुक्यातील मतदार भडकले; कपाटाला दिलेले मत सिलेंडर निशाणीला गेल्याचा आरोप
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आज निवडणुकीत प्रक्रिया पार पडत आहेत. या निमित्ताने प्रत्येक नागरिक मतदान केंद्रात जाऊन आपले कर्तव्य बजावत आहे. तसेच त्यांना हवा असलेल्या उमेदवाराला मत करत आहेत. परंतु, वेंगुर्ले (Vengurla) तालुक्यातील आरवली सोनसुरे येथील बूथ क्रमांक ७८ मध्ये बिघाड झाला होता. दरम्यान, कपाटाला मत दिल्यास ते मत सिलेंडरला जात असल्याचा आरोप मतदारांनी केला आहे. मतदारांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे संबधित मतदान मशीनमध्ये बदल करण्यात आला आहे. आमचे मत फुकट गेल्याचा आरोप करत मतदारांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहे.

दरम्यान, वेंगुर्ले मतदारसंघात आतापर्यंत ४५ टक्के मतदान झाले आहे. परंतु, मतदान मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे येथील मतदारांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी केलेले मत हव्या त्या उमेदवराला न जाता दुसऱ्याला जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर मतदारांनी वेळ न घालवता निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केली. त्यानंतर या मशीनमध्ये बदल करण्यात आला आहे. यावर निवडणूक आयोगाने अद्याप कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही. हे देखीला वाचा- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: वरळी मध्ये EVM मध्ये बिघाड; बूथ क्रमांक 62 मधील सदोष यंत्र बदलून पुन्हा मतदानाला सुरूवात

या निवडणुकीत शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसह मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचे फॅक्टरही महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक विविध अंगाने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महाराष्ट्रात एकूण 288 मतदारसंघ आहेत. त्यापैकी 29 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी तर 25 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत.