Maharashtra Power Outage: महाराष्ट्रात आजपासून लोडशेडिंग सुरू, मात्र 'या' भागांना मिळणार दिलासा
Representational Image (Photo Credits: Pixabay)

आजपासून महाराष्ट्रात अनेक भागात लोकांना लोडशेडिंगचा (Load shedding) सामना करावा लागणार आहे. विशेषत: विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात अनेक भागात वेळोवेळी वीज खंडित (Power outage) होणार आहे. महावितरण या महाराष्ट्रातील 2.8 कोटींहून अधिक ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या कंपनीने  मंगळवारपासून राज्यातील काही भागात लोडशेडिंग सुरू केले आहे. मात्र या वाढत्या उन्हात मुंबई, नवी मुंबई आणि ठाणेकरांना दिलासा मिळाला आहे. लोडशेडिंगचा त्रास होणार नाही. लोडशेडिंगची घोषणा करताना महावितरणने याचे कारणही दिले आहे.  एकीकडे वाढत्या उन्हात विजेची मागणी वाढत आहे. तर दुसरीकडे राज्यात सुमारे  2500 ते 3000 मेगावॅटचा तुटवडा निर्माण झाला आहे.

विजेचे कमी उत्पादन होत असल्याने संकट ओढवले आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. या कारणास्तव महाराष्ट्रातील अनेक भागातील शहरी आणि ग्रामीण भागात लोडशेडिंग करण्याची गरज आहे. वाढती मागणी आणि कमी उत्पादन यामुळे कंपनीला बाहेरून महागड्या दराने वीज खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे वगळता महाराष्ट्रातील अनेक भागात आजपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. हेही वाचा Kirit Somaiya Video: तक्रारीनंतर किरीट सोमय्यामकडून व्हिडीओ शेअर करत थेट राज्य सरकारला आव्हान, पहा नक्की काय म्हणाले ?

विशेषत: वीजचोरी, वीज वितरणातील तोटा आणि वीज बिलांची वसुली न होणे अशा ठिकाणी लोडशेडिंग केले जात आहे. हे G-1, G-2 आणि G-3 ग्राहक म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहेत. शहरी भागात सुमारे दोन तासांचे लोडशेडिंग असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईबाबत बोलायचे झाले तर कल्याण परिसरात वीजचोरी, बिल न भरणे अशा समस्या समोर येतात.

भांडुप-मुलुंडसह मुंबई आणि त्याच्या लगतच्या ठाणे आणि नवी मुंबईला अशी समस्या फारशी भेडसावत नाही, त्यामुळे या भागांना लोडशेडिंगपासून दूर ठेवण्यात आले आहे. या भागातील वीज वितरण व्यवस्थित आहे. इतर क्षेत्रांच्या तुलनेत बिल वसुलीही योग्य पद्धतीने होते. त्यामुळे येथे लोडशेडिंगचे कारण नाही. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील अनेक भागातील जनतेला लोडशेडिंगचा सामना करावा लागणार आहे.