Khanapur Gram Panchayat: चंद्रकांत पाटील यांचा किल्ला शिवसेनेने भेदला; खानापूर गावात भाजप हादरला, राष्ट्रवादी, काँग्रेसही पराभूत
Chandrakant Patil | (Photo Credits: Facebook)

भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना त्यांचे मूळ गाव असलेल्या खानापूर (Khanapur) येथून धक्का बसला आहे. खानपूर ग्रामपंचायत (Khanapur Gram Panchayat) निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्या गटाचा पूर्ण पराभव झाला आहे. या ठिकाणी शिवेसेना पक्षाने जोरदार मुसंडी मारत एकहाती विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांची मदत घेतली होती. तरीही इथे शिवसेनेला रोखण्यात भाजपला अपयश आले आहे. एकूण जागांपैकी 6 जागंवर विजय मिळवत शिवसेनेने खानापूरमध्ये बहुमत मिळवले आहे. या ठिकाणी शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटाचा विजय झाला. या विजयानंतर आमदार आबिटकर यांनी खोच प्रतिक्रिया देत चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. 'गाव करील ते राव काय करील' असे आमदार आबिटकर यांनी म्हटले आहे.

शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी या ठिकाणी अत्यंत विचित्र समिकरण पाहायला मिळाले. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांनी एकत्र येत आघाडी केली होती. या आघाडीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नाराजी व्यक्त केली होती. इतक्या पक्षांनी एकत्र येऊनही शिवसेनेने करुन दाखवत भगवा फडकवला आहे. (हेही वाचा, Patoda Gram Panchayat: भास्करराव पेरे पाटील यांच्या कन्या अनुराधा पेरे पाटील यांचा पराभव; पाटोदा ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल)

कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायतींसाठी पार पडले मतदान?

ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.