राज्याच्या नवीन मंत्रिमंडळात आम्हाला कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद द्या - रामदास आठवले
रामदास आठवले (Photo Credits-Facebook)

राज्यात विधानसभा निवडणुकीचे धक्कादायक निकाल (Assembly Election Results 2019) लागले आहेत. युती 220 जागा पार करेल म्हणणाऱ्या भाजप-शिवसेनेला आघाडीने चांगलीच टक्कर दिली आहे. आता राज्यात चर्चा आहे ती नव्या मंत्रिमंडळाची. राज्याचा नवीन मुख्याम्नात्री कोण होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशात रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपल्या पक्षाला एक कॅबिनेट आणि एका राज्यमंत्रीपद द्यावे अशी मागणी केली आहे. रिपाईचेचे दोन उमेदवार निवडून आले आहेत, त्यांच्या जोरावर रामदास आठवले यांनी ही मागणी केली आहे.

नव्या मंत्रीमंडळाबाबत चर्चा करण्यासाठी अमित शाह मुंबईमध्ये येणार आहेत. त्यावेळी ते उद्धव ठाकरे यांच्याशी नव्या मंत्री मंडळाबाबत चर्चा करतील. या चर्चेअंती आपल्या पक्षाला एक कॅबिनेट आणि एका राज्यमंत्रीपद मिळावी अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. आता या चर्चेनंतरच मंत्रिमंडळाचे नवे चित्र स्पष्ट होणार आहे. (हेही वाचा : मुख्यमंत्री पदाबाबत उद्या मातोश्रीवर शिवसेनेची तातडीची बैठक)

दरम्यान, यंदाचा निकाल हा युतीसाठी थोडा धक्कादायक असा आहे. विधानसभेचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर भाजपला 105 आणि शिवसेनेला 56 जागा मिळाल्या असून त्यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. मात्र त्यानंतर आता शिवसेनेकडून भाजपची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा निकालानंतर पत्रकार परिषद घेतल्यानंतर ही शिवसेनेसोबत भाजपने केलेला 50-50 फॉर्म्युलाची आठवण करुन दिली. याच पार्श्वभुमीवर आता शिवसेनेने मुख्यमंत्री पदाची मागणी करत असून उद्या मातोश्रीवर बैठक पार पडणार आहे. उद्या दुपारी 12 वाजता ही बैठक होणार असून शिवसेनेचे नवनिर्वातीच आमदारांसह नेतेमंडळी उपस्थित राहणार आहे.