एकनाथ खडसे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल; अपयशाची जबाबदारी घ्यावी, अशा शब्दात दिला इशारा
देवेंद्र फडणवीस आणि आमदार एकनाथ खडसे (संग्रहित आणि प्रतिकात्मक प्रतिमा)

भाजप नेते एकनाथ खडसे मागील काही दिवसांपासून भाजप मधील काही नेत्यांवर नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. त्यांना विधानसभेचं तिकीट न दिल्याने त्यांच्या नाराजीचा अजून भर पडली. आता मात्र एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. जी लोकं यशाचं श्रेय घाटात त्यांनी पराभवाची जबाबदारी सुद्धा घ्यावी अशी सणसणीत टीका त्यांनी फडणवीसांवर केली आहे.

एकनाथ खडसे आज भाजपच्या महिला नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेण्यास गेले होते. त्यांच्या जवळपास  दीड तास चर्चा झाली आणि नंतर खडसेंनी माध्यमांशी संवाद साधला.

या भेटीबद्दल सांगताना खडसे म्हणाले की, “पंकजाताईंची भेट ही कौटुंबीक भेट होती. गोपीनाथ मुंडे हे माझे चांगले मित्र होते. पंकजाताई आणि रोहिणीताईंचा पराभव झाला, त्या कारणांवर चर्चा झाली. ज्यांनी पक्षाविरोधी कामगिरी केली, त्यांची नावं वरिष्ठांकडे पाठवली आहेत, आता कारवाईची प्रतीक्षा आहे.”

इतकंच नव्हे तर खडसे असंही म्हणाले की, "बहुजन नेतृत्त्वाला डावलणं हे दुर्दैवाने घडलं आहे. तिकीटं न देणे किंवा त्यांना पाडणे हे घडलं आहे. 105 जण निवडून आले, पण जर नीट नियोजन केलं असतं तर भाजपचे आणखी आमदार निवडून आले असते."

सत्तावियोगाच्या धक्क्यात असलेल्या भाजपपुढे बंडखोरीचे आव्हान, एकाथ खडसे, पंकजा मुंडे यांच्या मनात चाललंय काय? राजकीय वर्तुळात चर्चा

देवेंद्र फडणवीस यांना खाद्य शब्दात खडसेंनी टोला लगावला. ते म्हणाले, "खालच्या माणसांना बोलण्यात अर्थ नाही. ज्यांनी हे निर्णय घेतले त्यांनाच दोष द्यावा लागेल. पक्षाचं नेतृत्व करणारे जसं यशाचे भागिदार होतात, तसं त्यांनी अपयशाचे भागिदारही व्हावं. यश मिळालं तर माझ्यामुळे आणि अपयश मिळालं तर दुसऱ्यामुळे हे माझ्या 40 वर्षांच्या राजकीय जीवनात आम्ही कधी शिकलो नाही. आमच्यावेळी देखील अपयश आलं, त्याला आम्हीही तोंड दिलं आहे. त्यावेळी आम्ही ते अपयश मान्य केलं."