Devendra Fadnavis Letter to Sonia Gandhi: ही वेळ राजकारणाची नसून जनतेबरोबर उभे राहण्याची आहे; देवेंद्र फडणवीस यांचे सोनिया गांधी यांना पत्र
Devendra Fadnavis, Sonia Gandhi (PC - PTI)

Devendra Fadnavis Letter to Sonia Gandhi: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहून महाराष्ट्र आणि मुंबईतील कोरोनावरील सद्यस्थिती आणि राज्यातील आकडेवारीवर भाष्य केलं आहे. ही वेळ राजकारणाची नसून जनतेबरोबर उभे राहण्याची आहे. सोनिया गांधी तसेच इतर काँग्रेस नेत्यांनी अलीकडेचं पंतप्रधान मोदींना काही पत्र पाठवले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले आहे की, अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोनिया गांधींनी पाठवलेली पत्रे आणि कॉंग्रेस नेत्यांची निवेदने वाचली. कदाचित काही मुद्दे तुमच्या लक्षात आले नाहीत. त्यामुळे फक्त त्या गोष्टी तुमच्या समोर आणण्यासाठी हे पत्र लिहिंल आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात लिहिलं आहे की, बरेच महिने आपण सर्वजण कोरोनरी साथीच्या आजारांला सामोरे जात आहोत. अशा परिस्थितीत देशाच्या सध्याच्या परिस्थिवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या महामारीच्या संदर्भात आपण जर संपूर्ण देशाच्या परिस्थितीचा विचार केला तर महाराष्ट्रातील परिस्थितीकडे अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही. (वाचा - माशा मारण्याची स्पर्धा तर दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरूच आहे, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे नवाब मलिकांना प्रत्युत्तर)

पत्रामध्ये महाराष्ट्रातील आकडेवारीचा उल्लेख

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात लिहिलं आहे की, जर आपण 13 मे 2021 रोजीच्या आकडेवारी विषयी बोलायचं झालं तर, देशातील एकूण कोरोना संक्रमणाच्या 22 टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील आहे. जे प्रमाण कित्येक महिन्यांपर्यंत 30 टक्क्यांपेक्षा जास्त राहिले आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूपैकी महाराष्ट्राची टक्केवारी 31 इतकी आहे. तसेच जर सक्रिय रूग्णांबद्दल बोलायचं झालं तर, सध्या राज्यात 14 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. आम्ही आशा करतो की, आपणही याविषयी सहमत आहात. जर महाराष्ट्रातील परिस्थिती लवकरचं सुधारली तर देशातील उपलब्ध स्त्रोतांवरील दबाव कमी होईल आणि आम्ही या संकटास पूर्ण ताकदीने सामोरे जाऊ शकू.

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार नाही, हे आपणास ठाऊकच आहे. तरीही केंद्रातील मोदी सरकार संपूर्ण ताकदीने महाराष्ट्रातील लोकांच्या पाठीशी उभे आहे. देशभरात देण्यात आलेल्या सर्व मदतीपैकी महाराष्ट्राला सर्वाधिक मदत मिळाली आहे. महाराष्ट्राला 1.80 कोटी लस देण्यात आल्या असून 8 लाखाहून अधिक रेमडेसिविर देण्यात आले. याशिवाय राज्याला सुमारे 1750 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. तसेच व्हेंटिलेटर, बीआयपीएपी आणि ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर देखील मोठ्या प्रमाणात दिले जात आहेत. त्यांचे अपयश लपवण्यासाठी बरेच नेते मोदी सरकारवर भाष्य करणे आपले अंतिम लक्ष्य मानतात, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मृत्यूची आकडेवारी लपविली जात आहेत -

देवेंद्र फडणवीस यांनी पुढे लिहिले आहे की, राज्य सरकार आणि माध्यमांचा एक विभाग मुंबईला महाराष्ट्र मानण्याची चूक करतो. परंतु, मुंबईच्या परिस्थितीकडे आपण पाहिले तर तेथे कमी चाचण्या करण्यात येत आहेत. याशिवाय कोरोनामुळे झालेले मृत्यू लपवण्याचे कामही केले जात आहे, असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.