महाराष्ट्र: COVID19 च्या परिस्थिती संदर्भात केंद्राकडून राज्य सरकारला कोणत्याही निधीची मदत नाही- विजय वडेट्टीवार
Maharashtra Minister Vijay Wadettiwar (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा विळखा अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. मात्र राज्य सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात मृत्यूदर कमी करण्याकडे सर्वाधिक लक्ष दिले जाईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले होते. दुसऱ्या बाजूला विरोधकांकडून राज्य सरकारच्या हातातून कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याची टीका करत आहेत. परंतु आता राज्याचे मंत्री विजय वड्डेटीवार (Vijay Wadettiwar) यांनी केंद्र सरकारकडून कोरोनाच्या परिस्थिती संदर्भात कोणताही निधीची मदत मिळाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. पुढे त्यांनी असे ही म्हटले आहे की, एखादा नेत्याने राज्याला निधी मिळाला असल्याचे म्हटले असल्यास तो विश्वासघात करत असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी कोणत्याही रोखीची कमतरा नसल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.

विजय वडेट्टीवार यांनी पुढे बोलताना असे म्हटले आहे की, राज्यात अशी परिस्थिती आहे ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी आम्हाला कर्ज घ्यावे लागणार आहे. परंतु 3-4 विभाग वगळता अन्य विभागांमध्ये खर्च कपात करण्यात आली आहे. तसेच कोविड योध्यांच्या पगारात कपात करणार नसल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.(महाराष्ट्र: कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीच्या उपचाराला यश, आतापर्यंत 93 हजार जणांची प्रकृती सुधारली- आरोग्यमंत्री राजेश टोपे)

दरम्यान, राज्यात कोरोनाचा वाढता आकडा पाहून कोविडच्या हॉटस्पॉट ठिकाणी पुन्हा लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. तसेच अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून नियमात शिथीलता आणत काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. परंतु त्यावेळी नियम आणि अटींचे पालन करावे अशा सुचना सुद्धा दिल्या आहेत. कोरोनाच्या परिस्थिबाबत बोलायचे झाल्यास आकडा 180298 वर पोहचला आहे. तसेच 8053 जणांचा बळी गेला असून 79075 जणांवर अद्याप उपचार सुरु आहेत. तसेच 9154 जणांची प्रकृती सुधारल्याची माहिती देण्यात आली आहे.