
महाराष्ट्राने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात मोठा टप्पा पार केला आहे. महाराष्ट्राने राज्यातील 11 कोटी नागरिकांचे लसीकरण (COVID-19 Vaccination) पूर्ण केले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण पूर्ण केल्याबद्दल राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेचे आणि आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आभार मानताना म्हटले आहे की, “महाराष्ट्रात ११ कोटी नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा टप्पा गाठण्यात आज यश आले. या यशाबद्दल महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे आणि लसीकरणाच्या कामात व्यस्त असणाऱ्या सर्वांचे अभिनंदन.”
राजेश टोपे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'महाराष्ट्रात अकरा कोटी नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा टप्पा गाठण्यात आज यश आले. या यशाबद्दल महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे आणि लसीकरणाच्या कामात व्यस्त असणार्या सर्वांचे अभिनंदन'. (हेही वाचा, Maharashtra School Reopen: पहिली ते दहावीपर्यंत सर्व शाळा 1 डिसेंबरपासून सुरु; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय)
पुढच्या ट्विटमध्ये राजेश टोपे म्हणतात की, 'राज्यात नऊ नोव्हेंबर रोजी दहा कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते. तेंव्हापासून राज्यात एक कोटींवर नागरिकांना लस देण्याचे काम झाले आहे. यामध्ये आरोग्य विभागाच्या सर्व स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानतो. राज्यातील ३.७६ कोटी नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आल्या आहेत. ७.२४ कोटी नागरिकांना एक मात्रा देण्यात आली आहे. लवकरच राज्यातील सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत'.