Maharashtra Political Crisis: तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले- छगन भुजबळ
Chhagan Bhujbal | Photo Credits: Facebook)

Chhagan Bhujbal on Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील उलथापालतीवर ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. 'तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले' असे भुजबळ यांनी म्हटले आहे. देहू येथे झालेल्या एका कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहिले होते. हाच धागा पकडत छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांनी राज्यातील राजकीय स्थितीवर विस्तारीत भाष्य करणे टाळले. मात्र, काही काळ वाट पाहू सर्व चित्र स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महाविकासआघाडी सरकारची आज एक मंत्रिमंडळ बैठक पार पडते आहे. या बैठकीबाबत विचारले असता, सर्व काही ठिक असल्याचे वाटते आहे. मला आजचीही मंत्रिमंडळ बैठक नेहमीचीच असल्यासारखे वाटते आहे. राज्यातील राजकीय घडामोडींवर मी भाष्य करणार नाही. आमचे सर्वोच्च नेते शरद पवार आज मुंबईत आहेत. त्यांची बैठक होईल. त्यानंतर पक्षाची भूमिका ठरेल, असेही भुजबळ म्हणाले. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: शिवसेनेमध्ये राखेतून जन्म घेण्याची ताकद; Eknath Shinde यांच्यासोबत बोलणी सुरू असल्याची Sanjay Raut यांची माहिती)

दरम्यान, शिवसेनेत जे घडले त्याबाबत भुजबळ यांनीही आश्चर्य व्यक्त केले. जे घडले ते अनपेक्षीत आहे. सर्व काही सुरळीत आहे असे वाटत असताना अचानकच असे काही घडले, असे भुजबळ म्हणाले.